Maharashtra Weather Update: दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या सीमेवर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आणि उत्तर भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे बुधवारी संपूर्ण कोकणपट्टा तापला होता. तापमानात अचानक लक्षणीय वाढ झाल्याने महामुंबई परिसरातील नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले. पुढील तीन दिवस तापदायक असतील, असा अंदाज हवमानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
मुंबईचे कमाल तापमान बुधवारी ३८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळपर्यंत तापमान काहीसे दिलासादायक होते; मात्र दुपारी उन्हाची तीव्रता वाढली. सूर्य माथ्यावर आल्यानंतर वैशाख सुरू झाला की काय, असे वाटू लागले. दक्षिण मुंबईपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरांपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारी १२ नंतर उष्ण वाऱ्याचे चटके बसू लागले.
दुपारी दोन ते तीनदरम्यान उन्हाची तीव्रता वाढल्याने जिवाची काहिली होऊ लागली. लोकल आणि बसच्या प्रवाशांना उन्हाच्या हाळांनी हैराण केले.
सूर्यास्तापर्यंत असेच वातावरण होते. महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
गुरुवारी तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज असला तरी ८ मार्चपर्यंत कोकण पट्टयात उष्णतेची लाट कायम राहू शकते, असा अंदाज हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी व्यक्त केला.
काय आहे अंदाज?
पुढील तीन दिवस कमाल तापमान चढेच राहील. मार्चची सुरुवातच उष्णतेच्या लाटेसदृष स्थितीने झाल्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असेल.
१० वर्षांतील मार्चमधील उच्चांकी तापमान
दिनांक व वर्ष - तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
१२ मार्च २०२५ - ३९.२
२२ मार्च २०२४ - ३८.८
१३ मार्च २०२३ - ३९.४
१५ मार्च २०२२ - ३९.६
२८ मार्च २०२१ - ४०.९
१७ मार्च २०२० - ३७.५
२६ मार्च २०१९ - ४०.३
२६ मार्च २०१८ - ४१
२८ मार्च २०१७ - ३८.४
२४ मार्च २०१६ - ३८२
२६ मार्च २०१५ - ४०.८
१८ मार्च २०१४ - ३८
गुजरातमध्ये निर्माण झालेल्या अँटी-सायक्लोनमधून उष्ण वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. परिणामी, कोकणपट्ट्यात तापमान वाढले आहे. - सुषमा नायर, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान विभाग
अधिक वाचा: मनाप्रमाणे जास्त क्षमतेचा सोलार प्रकल्प बसविण्याचा मार्ग झाला बंद; आता 'हा' नवा नियम लागू
