जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा गतवर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी (दि.३०) मार्चच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.४४ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र हा जलसाठा ५३.३९ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे.
सिंचन विभागाच्या माहितीनुसार, बोरी व मन्याड हे प्रकल्प वगळता बहुतांश सर्व धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. वाघूर (८०.२७ टक्के), सुकी (७८.१४ टक्के), अभोरा (७६.७३ टक्के) आणि मोर (७०.५४ टक्के) या प्रकल्पांमध्ये भरघोस पाणीसाठा आहे.
याउलट, बोरी (२०.४४ टक्के) आणि मन्याड (३६.४३ टक्के) या प्रकल्पांमध्ये तुलनेने कमी जलसाठा आहे. इतर प्रकल्पांमध्ये हतनूर (५४.३१), अग्नावती (५७.९७), मंगरुळ (५८.७५), अंजनी (६१.६५), गूळ (६६.५९) आणि शेळगाव बॅरेज (६५.२७) या प्रकल्पांमध्ये मध्यम ते चांगला साठा आहे.
बचतीचे आवाहन
सध्या परिस्थिती समाधानकारक असली तरी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची गरज असल्याचेही सिंचन विभागाने अधोरेखित केले आहे.
३० मार्चचा प्रकल्पनिहाय साठा (टक्के)
| प्रकल्प | जलसाठा | प्रकल्प | जलसाठा |
| हतनूर | ५४.३१ | गिरणा | ४२.६२ |
| वाघूर | ८०.२७ | मन्याड | ३६.४३ |
| बोरी | २०.४४ | भोकरबारी | ४४.८६ |
| सुकी | ७८.१४ | अभोरा | ७६.४३ |
| अग्नावती | ५७.९७ | तोंडापूर | ४६.७२ |
| हिवरा | ३१.४६ | मंगरुळ | ५८.७५ |
| बहुळा | ५१.४६ | मोर | ७०.५४ |
| अंजनी | ६१.६५ | गूळ | ६६.५९ |
| शेळगाव बॅरेज | ६५ .२७ | - | - |
हेही वाचा : हवामान बदल आणि शेती पुढील आव्हाने; जाणून घ्या यावरील शाश्वत उपाय
