मुंबई : जुलैसोबतच ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मुंबईसह राज्यभरात थैमान घालणारा पाऊस आता दिवाळीतही पडणार आहे. १५ ते २० ऑक्टोबर (नरक चतुर्दशी) दरम्यानच्या सहा दिवसांत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील.
या कालावधीत तुरळक ठिकाणी मध्यम ते किरकोळ पावसाचा अंदाज असून, १५ व १६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या हवामानात बदल होणार असून, १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.
वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसाचे सर्वाधिक प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाचा अंदाज राहील.
तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडेल, तर मुंबईचे आकाश निरभ्र राहणार असून, हवेच्या गुणवत्तेचा दर्जा मध्यम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
परतीचा मान्सून सध्या कुठे?
◼️ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परतीच्या मान्सूनने सोमवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा ओलांडून कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल व पूर्वोत्तर राज्यात प्रवेश केला आहे.
◼️ परतीच्या मान्सूनची सीमा रेषा कारवार, कलबुर्गी, निझामाबाद, गुवाहाटीतून जात असून, देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी ८५ टक्के भागातून मान्सूनने माघार घेतली आहे.
◼️ दरवर्षी मान्सून साधारणतः देशातून सरासरी १५ ऑक्टोबर दरम्यान माघार घेतो. येत्या दोन ते तीन दिवसात देशाच्या उर्वरित १५ टक्के भूभागावरून मान्सून परतेल, असा अंदाज आहे.
अधिक वाचा: पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींना मिळणार आता वेगळी मदत; किती आणि कसे मिळणार पैसे?