उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे. सध्या उजनीतून शेतीसाठी उजनी मुख्य कालवा, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव व सीना माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात येत आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी ८१ टक्के असून २६ जानेवारीपासून १९ टक्के पाणी पातळी कमी झाली आहे.
धरणातून रब्बी हंगामासाठी सुरुवातीला उजनी मुख्य कालवा, जोड कालवा व दहिगाव योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सीना माढा उपसा सिंचन योजना व ५ फेब्रुवारीपासून भीमा नदीत नदीकाठचा शेती व पाणी पुरवठा योजनासाठी सोडण्यात आले होते. ते १२ रोजी बंद करण्यात आले आहे.
गतवर्षी २९ डिसेंबर रोजी शंभर टक्के होते. गतवर्षीचा तुलनेत एक महिना उशिरा शंभर टक्के पाणी पातळी राहिली आहे. सध्या धरणात १०७.१८ टीएमसी पाणीसाठा असून ४३.५२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. आत्तापर्यंत १० टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.
कालव्यातून २ हजार ३०० क्युसेक, जोड कालव्यातून ६०० क्युसेक सीना माढा उपसा सिंचन योजनेतून २८० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. उजनी साधारण एप्रिल शेवटी मे महिन्याचा सुरुवातीला मृत साठ्यात जात असते.
दोन महिन्याचा प्रश्न सुटला
सध्या रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येत आहे. पुढील दोन पाळ्या उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात येतात. सध्या उजनी धरणातून भीमा नदीत नदीकाठचा गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात आल्याने पुढील दोन महिने पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
५ ते ६ टीएमसीची बचत
सोलापूर शहराला पिण्यासाठी समांतर जल वाहिनी सुरू झाल्यामुळे ५ ते ६ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. यामुळे जूनअखेरपर्यंत शेतीला पाणी मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे. प्रशासन उजनीच्या पाण्याचे नियोजन कसे करते यावर अवलंबून राहणार आहे.
