शेषराव वायाळ
जालना जिल्ह्याच्या परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, धरणातील जिवंत पाणीसाठा सध्या केवळ ५७.३२ टक्क्यांवर आला आहे. परिणामी, बॅकवॉटरमध्येही झपाट्याने घट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यामुळे परिसरातील बागायती शेती आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. निम्न दुधना प्रकल्पाची मूळ पाणी साठवण क्षमता सुरुवातीला १०० टक्के होती.
मात्र, धरणग्रस्तांच्या संपादित न झालेल्या जमिनींमध्ये पाणी साचून नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने धरणाची साठवण क्षमता ७५ टक्क्यांवर आणली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा मुळातच २५ टक्क्यांनी कमी झाला आहे.
धरणग्रस्तांचे प्रश्न अद्याप मार्गी लागले नसताना साठवण क्षमतेत कपात केल्याने प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच बगल मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. ऊस पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असल्याने धरणातील उपलब्ध पाण्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
परिणामी, जिवंत पाणीसाठ्यात सातत्याने घट होत असून, बॅकवॉटर जलद गतीने ओसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
धरणामुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात जाण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत, मावेजा न मिळालेल्या जमिनीत पाणी साचते. पुनर्वसित गावात कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. प्रशासनाने आमचे प्रश्न तत्काळ सोडवून न्याय द्यावा. - विष्णू डोणे, शेतकरी, रोहिणा.
धरणग्रस्तांचे अनेक वर्षांपासून प्रप्रश्न लंबित आहेत. धरणाचा मावेजा अवेळी मिळाल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. आम्हाला न्याय द्यावा. - रामदास घोंगडे, शेतकरी, मापेगाव खुर्द.
धरणग्रस्तांचे अद्यापही प्रश्न प्रलंबितच
• धरणाची साठवण क्षमता १०० टक्क्यांवर पूर्ववत केल्यास पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. मात्र, त्यासाठी धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
• याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन धरणग्रस्तांना न्याय देत प्रकल्पाची पूर्ण क्षमतेने पाणी साठवण व्यवस्था कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
• दरम्यान, निम्न दुधना प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र विकसित झाले आहे. विशेषतः दुधना नदीच्या पात्रातील बॅकवॉटर परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
