यंदा पहिल्याच पावसाने नाशिककरांवर आभाळमाया दाखविली असून मागील वर्षी याच दरम्यान ३९९ वर गेलेली टँकरची संख्या यंदा अवधी ३४ वर आली असून गेल्या आठ दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे ६ तालुके आणि ४५४ गावे टँकरमुक्त झाली आहेत.
मुख्य म्हणजे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ४१ टक्के पाणीसाठा झाला आहे तर जायकवाडीकडे बुधवारी (दि. २५) सकाळपर्यंत ६.५ टीएमसी पाणी गेले आहे. यंदा जूनमध्ये झालेल्या पावसामुळे नाशिककरांना चांगलाच दिलासा मिळाला. संततधार कोसळलेल्या पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडली असून २५ जूनपर्यंत १८५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या भागात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ झाली असून ५ धरणांतून विसर्गही करण्यात आला. गंगापूर धरण १५ वर्षानंतर ६५ टक्क्यांवर गेल्याने तेथूनही विसर्ग करण्यात येत आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील धरणसाठा ४१.३ टक्केवर पोहोचला असून मागील वर्षी तो केवळ ७ टक्के इतकाच होता. आभाळमाया झाल्याने टँकरची संख्याही कमी झाली असून जून महिन्याच्या सुरुवातीस ५९१ गावांसाठी सुरू असलेले १४८ टँकर २५ जून रोजी ३४ वर आले आहेत. ८ तालुक्यांत मोजक्याच ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
अद्यापही विसर्ग सुरुच
धरणातील विसर्ग कमी झाला असला तरी कायम असून त्या दारणा ४७४२, गंगापूर १७६०, कडवा १०६०, नांदूरमधमेश्वर १२,५२० तर पालखेडमधून ७६० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नाशिकमधून जायकवाडीकडे बुधवारपर्यंत (दि. २५) तब्बल ६,७६७ दलघफू पाणी रवाना झाले आहे.
हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप