राहुरी : दक्षिण आहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंजीवनी असलेले मुळा धरण ४८ टक्के भरले आहे. धरणात आतापर्यंत ३ हजार ४१२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे.
कोतुळ (लहित खुर्द) येथून धरणाकडे १ हजार ८७३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अभियंता सायली पाटील व धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात १२ हजार ३१८ दशलक्ष घनफूट (४७टक्के) पाणीसाठा आहे.
यंदाच्या वर्षी शेती, पिण्यासाठी व व्यवसायासाठी पाणी खर्च होऊन ८ हजार ३७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहिला होता.
सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यामध्ये साधारणपणे ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, असे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुळा धरणावर राहुरी, शेवगाव, पाथर्डी व नेवासा हे तालुके अवलंबून आहेत. धरणाच्या उजव्या कालव्यावर सुमारे ७० हजार, तर डाव्या कालव्यावर १० हजार १२१ हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून कोतुळ येथे आतापर्यंत १९६ मिलिमीटर, तर मुळा नगर येथे १७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
अधिक वाचा: 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजेनेचे काम कसे चालते? कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर