सातारा जिल्ह्याच्या ढेबेवाडी विभागाला वरदान लाभलेले उत्तर वांग नदीच्या महिंद येथे २९ वर्षांपूर्वी पूर्ण झालेले महिंद धरण यंदा पावसाळ्यात लवकरच पूर्ण क्षमतेने भरले आणि सांडव्यावरून पाणी वाहात आहे. धरण १०० टक्के भरले. मात्र, धरणात मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्षे गाळ साठला असल्याने धरणात गाळ किती व पाणी किती? असा प्रश्न पडत आहे.
साधारण ०.९० ते १ टीएमसी पाणी साठवण क्षमतेचे हे धरण १९९६-९७ मध्ये साधकाम पूर्ण होऊन त्याचवर्षी घळभरणी झाली व लाभ क्षेत्रातील पाणीपुरवठा होऊन बहुतांश जमिनी ओलिताखाली येतील, हा विश्वास निर्माण झाला. धरणाचे लाभक्षेत्र सळवे, महिंद, सणबूर, बनपुरीपर्यंत आहे.
मात्र, याच धरणाखालील नदीकाठी असलेल्या शितपवाडी, जानुगडेवाडी, मंदूळकोळे व मंदुळकोळे खुर्द ही गावे दक्षिण वांग नदीवरील वांग-मराठवाडीच्या लाभक्षेत्रात चुकीच्या पद्धतीने घालून महिंदचे लाभक्षेत्र बनपुरीपर्यंत करण्याचा चुकीचा निर्णय घेण्यात आल्याने चार गावांना या धरणाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते. महिंद धरणाच्या पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा तिन्ही बाजूस डोंगर व जंगलयुक्त परिसर आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाई
महिंद धरणात पाणी अडवून २४ वर्षे होऊन गेली तरी अद्याप लाभक्षेत्रातील लोकांच्या पाण्याचे नियोजन संबंधित विभागाला करता आलेले नाही. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचून आहे, तो काढण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी तशीच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या परिसरातील लोकांना पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे.