Maharashtra Weather News : फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीलाच राज्यातील तापमानात मोठी वाढ (Rise In Temperature) झालेली दिसून येत होती. मात्र, आज (१२ फेब्रुवारी) रोजी राज्यातील तापमानात काहीशी घट नोंदवली गेली असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीश्या प्रमाणात आता दिलासा मिळणार आहे.
IMD ने दिलेल्या माहिती नुसार, पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance) ओसरल्यानंतर पुन्हा उत्तरेकडील वारे उत्तर-मध्य महाराष्ट्रात, विदर्भासह उर्वरित क्षेत्रात प्रवेश करत असल्यामुळे बुधवारी रात्रीपासून १४ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत हे वारे राज्यात शिरकाव करणार असून त्यामुळे रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये असणारा थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी होत असतानाच मात्र मुंबईमध्ये तापमानात झालेली वाढ कमी होत असून, हवेत गारवा जाणवत आहे.
साधारण आठवड्याभरापूर्वी उत्तर भारतातून दक्षिणेच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याने मुंबईतील थंडी कमी झाली होती. आता मात्र वाऱ्याच्या मार्गातील हे अडथळे दूर झाले असून, हे वारे नाशिक, ठाणे, नवी मुंबईसह मुंबईच्या दिशेने वाहणार आहेत. त्यामुळे उन्हाच्या झाळ्या आता काही प्रमाणात कमी होणार आहेत. येत्या २४ तासांत राज्यातील काही शहरात गारठा अनुभवता येणार आहे.
दरम्यान, १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि पुण्यात किमान तापमानात २-४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.
* 'व्हॅलेंटाइन्स डे'मुळे बाजार पेठेत गुलाब फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.