जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील नांद्रे, अलवाडी, सायगावसह २२ गावांच्या शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या मन्याड धरणातून यंदा उन्हाळी हंगामासाठी तिसरे आवर्तन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी किमान १० ते ११ गावांमधून मागणी झाल्यास गिरणा पाटबंधारे विभागाकडून नियोजन केले जाणार आहे.
मन्याड धरणाच्या लाभक्षेत्रात एकूण २२ गावांचा समावेश असून, या धरणामुळे परिसरातील शेती समृद्ध झाली आहे. ऊस, कापूस, मका, केळी, फळबाग व भाजीपाला पिकांना या पाण्याचा मोठा आधार मिळतो. साधारणपणे धरण पूर्ण भरल्यास दोन आवर्तने दिली जातात; मात्र यंदा कालव्यांच्या दुरुस्तीमुळे तिसन्या आवर्तनाची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी नांद्रे ते देवळी दरम्यान मुख्य कालवा व पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने गळती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यापूर्वी सुमारे ४० टक्के पाण्याची नासाडी होत होती. दुरुस्तीमुळे ही गळती थांबून पाण्याचा योग्य वापर शक्य झाला आहे. सद्यस्थितीत धरणात सुमारे २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असला तरी उपलब्ध पाण्यावर तिसरे आवर्तन देण्याचे नियोजन यशस्वी होऊ शकते, असे सांगण्यात आले.
अनेक वर्षांनंतर मिळणार तिसरे आवर्तन
गेल्यावर्षी नांद्रे ते देवळी या २१ किमी लांबीच्या पाटचारीसह मुख्य कालव्याच्या दुरुस्तीसाठी साडेबारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यंदा हे धरण ओसंडून वाहिले. गत ५२ वर्षात मन्याड ३४ वेळा ओव्हरफ्लो झाले आहे. पाटचाऱ्यांच्या दुरावस्थेमुळे ४० टक्के पाण्याची गळती होत होती. ही गळती यंदा थांबल्याचे दिसून आले आहे.
दुरुस्तीमुळे गळती थांबली असून गेल्या अनेक वर्षानंतर यंदा प्रथमच धरणातून तिसरे आवर्तन मिळू शकते. दुरुस्तीमुळे नासाडीसह गळतीलाही ब्रेक लागल्याने २० दिवसात तीन आवर्तने देण्याचे नियोजन यशस्वी होऊ शकते. तिसऱ्या आवर्तनाचा हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यंदा पहिल्यांदाच मिळणाऱ्या तिसऱ्या आवर्तनामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे.
नासाडी थांबणार
यापूर्वी गळतीमुळे जवळपास ४० टक्के पाण्याची नासाडी होत होती. ती आता कालवा व पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीमुळे थांबणार आहे. सध्या धरणात केवळ २० टक्के साठा असल्याचे मन्याड मध्यम प्रकल्प कार्यालयातर्फे सांगण्यात आले असून तरीही तिसऱ्या आवर्तनाचे नियोजन शक्य असल्याचेही सांगण्यात आले. मन्याड धरणामुळे सुमारे ४ हजार ८३४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. यंदा दोन आवर्तने आधीच दिली गेली असून, अतिरिक्त पाणी उपलब्ध असल्याने तिसऱ्या आवर्तनाची शक्यता निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्य कालवा व पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीमुळे गळती कमी झाली असून, सध्याच्या २० टक्के जलसाठ्यातूनही तिसरे आवर्तन देणे शक्य आहे. मात्र, यासाठी संबंधित गावांकडून मागणी येणे आवश्यक आहे.
- धनंजय गायकवाड, शाखा अभियंता, मन्याड मध्यम प्रकल्प
