- मोहन भोयर
भंडारा : मे महिन्याची सुरुवात होताच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, त्याचा थेट फटका जलप्रकल्पांना बसू लागला आहे. पूर्व विदर्भातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पातील जलसाठ्याने आता तळ गाठायला सुरुवात केली आहे.
सध्या या प्रकल्पात केवळ २५ टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने संकट गडद होताना दिसत आहे. प्रखर उन्हाचा फटका आता सिंचन प्रकल्पांनाही बसत आहे.
जिल्ह्याचा पारा ४४ अंशांच्या पार गेल्याने प्रकल्पातील पाणी वेगाने कमी होत आहे. प्रकल्पाच्या तांत्रिक वाटणीनुसार, शिल्लक असलेल्या २५ टक्के साठ्यापैकी अर्धे पाणी मध्य प्रदेशच्या वाट्याला जाणार आहे.
तहान भागवायची की, उभ्या पिकांना जीवदान द्यायचे!
शिल्लक असलेल्या १२ टक्के पाण्यातून लोकांची तहान भागवायची की, उभ्या पिकांना जीवदान द्यायचे, अशा कात्रीत जलसंपदा विभाग अडकला आहे. जर पावसाळा लांबणीवर पडला, तर जून अखेरपर्यंत हे पाणी पुरवणे अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे. तुमसर आणि मोहाडी तालुक्यांतील शेती पूर्णपणे या प्रकल्पावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
यावर आता प्रकल्प विभाग काय निर्णय घेते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परिणामी महाराष्ट्राच्या (भंडारा जिल्हा) वाट्याला जेमतेम १२ ते १२.५ टक्केच पाणी येणार आहे. या अत्यल्प साठ्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सध्या प्रकल्पात केवळ २५ टक्के जिवंत साठा असून, सिंचन अंतिम टप्प्यात आहे. उपलब्ध पाण्यात महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचा वाटा आहे. कडाक्याचे ऊन पाहता नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पाण्याचा अत्यंत जपून वापर करणे गरजेचे आहे.
- आर. आर. बडोले, अभियंता, बावनथडी प्रकल्प
100 टक्के अनुदानावर बियाणे मिळणार, 'महाडीबीटी' पोर्टलवर अर्ज केला का? असा करा अर्ज
