Maharashtra water storage : मराठवाड्यात वाढत्या उन्हाच्या झळांमुळे धरणांतीलपाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या अनेक प्रकल्पांमध्ये जलसाठा निम्म्यावर आला आहे. (Maharashtra water storage)
गेल्या महिनाभरापासून तापमान सातत्याने वाढत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. तरीही दिलासादायक बाब म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा दुप्पट असल्याने परिस्थिती काहीशी नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.
४१ अंशांपुढे तापमान; बाष्पीभवनात वाढ
गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, त्यामुळे जलसाठ्यात दिवसेंदिवस घट नोंदवली जात आहे.
मोठ्या धरणांमध्ये ५२% साठा
मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांमध्ये सध्या सरासरी ५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात सुमारे ५० टक्के पाणी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा केवळ २७ टक्के होता.
मध्यम प्रकल्पांमध्ये ४१% जलसाठा
प्रदेशातील ७५ मध्यम धरणांमध्ये सध्या ४१ टक्के पाणीसाठा आहे. बीड, लातूर, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जलसाठा ४० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. मात्र, गतवर्षी याच काळात हा साठा २६ टक्के होता.
लघु प्रकल्पांची स्थिती चिंताजनक
मराठवाड्यातील ७५८ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये एकूण १६५३.४० दलघमी संचय क्षमता आहे. सध्या यामध्ये ५४७ दलघमी म्हणजेच ३३ टक्के पाणी शिल्लक आहे.
ही पातळी चिंताजनक मानली जात असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुधारित आहे.
आकडेवारीतून स्पष्ट चित्र
मोठे प्रकल्प: २७८१ दलघमी साठा (गतवर्षी १७६)
मध्यम प्रकल्प: ३९२ दलघमी (गतवर्षी २५६)
लघु प्रकल्प: ५४७ दलघमी (गतवर्षी ३२५)
पुढील काळात आव्हान वाढण्याची शक्यता
उन्हाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा सध्या निम्म्यावर आला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत स्थिती सुधारलेली आहे.
मात्र, वाढत्या उन्हामुळे आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये यासाठी योग्य नियोजन गरजेचे ठरणार आहे.
