Maharshtra Weather Update : राज्यात हवामानाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. मे महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, आता चक्रीवादळाच्या (Cyclone Shakti Alert) धोक्याने महाराष्ट्रावर नवे संकट घोंगावत आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. कोकणासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने (IMD Alert) दिला आहे. यामुळे प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Cyclone Shakti Alert)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रावर निसर्गाचा मोठा तडाखा बसत असून राज्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. मे महिन्यात सूर्यदेव झाकोळला गेला असून पावसाने राज्यात हजेरी लावली आहे.
विशेष म्हणजे मान्सूनदेखील यंदा वेळेपेक्षा आधी सक्रिय झाला असून तो मे अखेरीस महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर राज्यात पावसाची संततधार राहणार आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने (IMD Alert) दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण आणि गुजरातपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चक्रीवादळ 'शक्ती'ची शक्यता
* पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या ३६ तासांत ते अधिक तीव्र होऊन 'शक्ती' या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकणार असून याचा थेट फटका महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे.
* या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग काही भागांत ६० किमी/ताशीपर्यंत पोहोचू शकतो.
मच्छीमारांसाठी सावधानतेचा इशारा
हवामान खात्याने (IMD Alert), मच्छीमारांना पुढील दोन ते चार दिवस महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर मासेमारीसाठी न जाण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. समुद्र खवळलेला असून धोका वाढला आहे.
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोरदार फटका
रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी, चाकरमानी आणि मच्छीमारवर्ग संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी लग्नसमारंभ, वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे.
सावध रहा, सुरक्षित रहा
हवामान खात्याने (IMD Alert) नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या भागांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून आपत्कालीन उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.