नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचा परतीचा प्रवास १५ सप्टेंबरदरम्यान सुरू होऊ शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी ही माहिती दिली.
साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये वर्दी देतो. ८ जुलैपर्यंत तो संपूर्ण देशभर पसरतो. १७ सप्टेंबरदरम्यान तो वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णतः परततो.
सध्या १७ सप्टेंबरच्या जवळपास राजस्थानच्या काही भागातून मान्सूनच्या परतीच्या दृष्टीने अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.
यंदा २०२० नंतर प्रथमच मान्सून सर्वसाधारण ८ जुलैच्या तारखेआधी ९ दिवस लवकर दाखल होऊन २६ जून रोजी त्याने देश व्यापला होता. यंदा २४ मे रोजीच मान्सूनने केरळमध्ये वर्दी दिली होती.
यापूर्वी २००९ मध्ये २३ मे रोजी मान्सून दाखल झाला होता. यंदाच्या हंगामात आतापर्यंत देशात ८३६.२ मिमी पाऊस झाला असून सरासरी ७७८.६ मिमीच्या तो ७ टक्के अधिक आहे.
उत्तर-पश्चिमेत सरासरी ५३८.१ मिमीच्या तुलनेत ३४ टक्के अधिक ७२०.४ मिमी पाऊस झाला. गेल्या ५० वर्षांतील पावसाची सरासरी म्हणजे सामान्य पाऊस मानला जातो.
अधिक वाचा: Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख