यंदा नियोजित वेळेपेक्षा लवकर दाखल झालेला नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून आतापर्यंत १८ राज्यांत दाखल झाला असून अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे.
मान्सूनच्या आगमनापासून सहा दिवसांत देशभर सरासरीच्या ३३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. उत्तर भारतात मान्सूनची प्रतीक्षा असून बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात १२ ते १५ जूनपर्यंत तो सक्रिय होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
दक्षिणेतील राज्यांत मान्सूनचे दमदार आगमन झाले असून ईशान्य भारतातील राज्यांतही जोरदार वर्दी दिली आहे. हवामान शास्त्र विभागानुसार १८ राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय किंवा काही प्रमाणात दाखल झाला आहे.
बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे.
यादरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यातील काही भागांत हलका पाऊस पडू शकतो. राज्यातील बहुतांश भागांत मात्र कोरडे हवामान अपेक्षित असल्याचे कृषी विभागाने कळवले आहे. बदललेल्या या वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होईल.
या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा: तण नियंत्रण आच्छादन, फळ पिकांकरिता कव्हर व हायड्रोपोनिक्ससाठी मिळतंय अनुदान; वाचा सविस्तर