कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी दाट धुके आणि दिवसभर कडक उष्मा आणि सायंकाळी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. आगामी आठवड्यात जिल्ह्याच्या कमाल तापमानात घट होत जाणार असली तरी किमान तापमान २० ते २२ डिग्रीपर्यंत राहणार असल्याने उष्मा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शनिवारी सकाळी जिल्ह्यात दाट धुक्याची झालर पसरली होती. ऐन उन्हाळ्यात धुके पडू लागल्याने उष्मा कमी होईल, असे वाटत होते. मात्र, उष्यामध्ये वाढच झाली आहे. शनिवारी किमान तापमान २२ डिग्री तर कमाल ३७डिग्री होते. दरम्यान, कोल्हापूर शहरात दिवसभर उभ्याने नागरिक घामाघूम झाले होते. मात्र, दुपारनंतर शहरात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पण त्यानंतर उष्मा कमी होण्यापेक्षा वाढत गेला.
कसबा वाळवे येथील आठवडी बाजारात शनिवारी सायंकाळी अचानक गारांसह झालेल्या पावसामुळे व्यापारी व ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. सुमारे तासभर सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक भाजीपाला विक्रेत्यांचा माल पावसाच्या पाण्यात भिजून राहिला, तर काही ठिकाणी भाजीपाला वाहून गेल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
उत्तूरला तासभर हजेरी
• शनिवारी (दि. १४) दुपारी ४ वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर वाढलेल्या उषयाने त्रासलेल्या ग्रामस्थांना पावसाने दिलासा मिळाला. शनिवारी बाजाराचा दिवस होता. पावसाने बाजारवाल्यांची गडबड उडाली होती. दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवेत प्रचंड उकाडा असल्याने दुपारी बाजारात किरकोळ गर्दी होती.
• दुपारी ३ नंतर जोरदार वारे वाहत होते. नंतर वादळी वाऱ्यासह पाऊण तास जोरदार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह तासभर पाऊस पडला. ग्रामस्थांना पावसामुळे उषयापासून दिलासा मिळाला. बाजारात अचानक आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी ताडपत्रीचा आडोसा अनेकांनी घेतला.
करवीर तालुक्यात गारांचा पाऊस
कोपार्डे : करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात फुलेवाडी, बालिंगा, पाडळी खुर्द परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारा देखील पडल्या. पिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.
असे राहणार आगामी पाच दिवसांतील तापमान
| वार | किमान | कमाल |
| रविवार | २० | ३५ |
| सोमवार | १९ | ३५ |
| मंगळवार | २१ | ३४ |
| बुधवार | २० | ३४ |
| गुरुवार | १८ | ३३ |
शेतीचे नुकसान
म्हाकवे : म्हाकवेसह चिखली, खडकेवाडा, बानगे, आणूर, हमिदवाडा, गोरंबे, केनवडे परिसरात वळीव पावसाने हजेरी लावली. हमिदवाडा, चिखली परिसरातील तंबाखू कापणी अंतिम टप्प्यात आली आहे, तर परिसरात गहू, ज्वारीची कापणी मळणी सुरू आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कापणी केलेली गहू, ज्वारी पिकांचे नुकसानही झाले आहे. कुंभार बांधवांची विटा वाचवण्यासाठी गडबड उडाली होती.
