महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता आणखी वाढल्याचे चित्र रविवारी दिसून आले. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून, अकोला आणि वर्धा येथे सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र असल्याचे दिसते. राज्यातील तब्बल १५ शहरांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. त्यात अमरावती, परभणी, नागपूर, यवतमाळ, ब्रम्हपुरी, जळगाव, वाशीम, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांचा समावेश आहे.
विदर्भात उष्णतेचा जोर सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर आणि यवतमाळमध्ये तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान राहिले. मराठवाड्यातही परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथे पारा चांगलाच वाढल्याचे दिसून आले.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये ४४ अंश, तर साताऱ्यात ४०.२ अंश तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे, डोंगराळ भाग असलेल्या महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी ३२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
सर्वाधिक तापमान असलेली शहरे
| शहरे | तापमान | शहरे | तापमान |
| अकोला | ४६.०° | वर्धा | ४६.०° |
| अमरावती | ४५.८° | परभणी | ४५.२° |
| चंद्रपूर | ४४.६° | नागपूर | ४४.४° |
| यवतमाळ | ४४.४° | जळगाव | ४३.९° |
| वाशिम | ४३.०° | छत्रपती संभाजीनगर | ४२.४° |
| बुलढाणा | ४२.२° | सांगली | ४२.०° |
| धाराशिव | ४१.९° | गोंदिया | ४१.२° |
| सातारा | ४०.२° | - | - |
भरपूर पाणी प्या
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दुपारच्या सुमारास उष्ण वाऱ्यांचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे दुपारी १२ ते ४ दरम्यान शक्यतो बाहेर पडणे टाळा. भरपूर पाणी प्यावे.
