पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यासह पवना परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, परिसरातील शेती आणि जलस्रोतांना नवसंजीवनी मिळाली आहे. मंगळवारी २६ मिलीमीटरमी पावसाची नोंद झाली आहे. धरण पहिल्यांदाच जूनमध्ये निम्मे भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात दररोज लक्षणीय वाढ होत आहे.
गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसाने दिवसभरात विश्रांती घेतलेली नाही. परिणामी भातशेतीच्या खाचऱ्या, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. डोंगरकपारींमध्ये लपलेले धबधबेही पुन्हा खळखळून वाहू लागले आहेत. जणू निसर्गच आनंदाने जलसंगीत सादर करतोय. पिंपरी-चिंचवड आणि मावळवासीयांच्या जीवनवाहिनी ठरलेल्या पवना धरणात ५१.३४ टक्के पाणीसाठा झाल्याचे अधिकृत आकडेवारीद्वारे समोर आले आहे.
१ जूनपासून आतापर्यंत एकूण ६०७.१६ मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्यावर्षी याच दिवशी धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाचा पावसाळा अधिक समाधानकारक ठरत असल्याची माहिती पवना धरण शाखा अभियंता रजनीश भारिया यांनी दिली.