विकास शहा
चांदोली (ता. शिराळा) धरणातूनवीजनिर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे.
गेल्या साडेसहा महिन्यात १५ टीएमसी साठा कमी झाला आहे. तर गेल्या २१ दिवसांत ३ टीएमसीने घट झाली आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा दोन टीएमसीने जादा आहे. तालुक्यातील ४९ पैकी २० पाझर तलाव एप्रिलमध्येच कोरडे पडलेत.
चांदोली धरणातूनवीजनिर्मिती केंद्रातून कालव्यात ३२६ क्युसेकने, तर नदीत ९८९ क्यूसेकने असा एकूण १३१५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. बाष्पीभवन वेगाने होत असल्याने पाणी साठा वेगाने कमी होत आहे.
चांदोली धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. उपयुक्त साठा १२.४१ टीएमसी आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये तो १०.३७ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी २.०४ टीएमसी साठा जास्त आहे. पण बाष्पीभवन वेगाने होत असल्याने वेगाने घट होत आहे.
पाणीटंचाईचे सावट
मोरणा धरणातून शेतीला पाणी द्यावे, तसेच औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यात कपात करावी, अशी मागणी होत आहे. मोरणा धरणात ३५ टक्के, गिरजवडे ५२ टक्के, करमजाई ८५ टक्के, अंत्री खुर्द २७ टक्के, शिवणी २३ टक्के, टाकवे ३३ टक्के, कार्वे २५ टक्के व रेठरे धरण ३ टक्के साठा आहे. ३३० कूपनलिकांनी तळ गाठला आहे.
चांदोली धरणाची आजची स्थिती
क्षमता - ३४.४० टीएमसी
आजचा पाणीसाठा - १९.२९ टीएमसी (५६.०७ टक्के)
उपयुक्त पाणीसाठा - १२.४१ टीएमसी (४५.०७ टक्के)
गत हंगामातील एकूण पाऊस - ४००१ मिलिमीटर
वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग - १३१५ क्यूसेक
कालव्यातून विसर्ग - ३२६ क्यूसेक
नदीपात्रात विसर्ग - ९८९ क्यूसेक
कोरडे झालेले तलाव
हातेगाव (अंबाबाईवाडी), शिरसी (गिरजवडे रस्ता), शिरसी (काले खिंड), शिरसी (कासारदरा), पाचुंब्री, करमाळे, शिवारवाडी, भैरववाडी, निगडी जुना, निगडी (खोकड दरा), इंग्रूळ, पावलेवाडी क्रमांक १ आणि २, कॉडाईवाडी क्रमांक १ आणि २, धामवडे, तडवळे वडदरा, तडवळे १, भाटशिरगाव, सावंतवाडी.
तलावांच्या बुडीत व संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांनी थेट पंपाद्वारे पाणी उपसा करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल. - प्रवीण तेली, जलसंपदा अधिकारी
अधिक वाचा: उन्हाळ्यात उसाच्या खोडवा पिकात होऊ शकतो चाबूक काणी रोगाचा प्रादुर्भाव; काय कराल उपाय?