अलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठवण्याची क्षमता असून, धरणात सध्या ७५.२५ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ६१ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांकडेही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले आहे.
सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. जुलै, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. असे असतानाही जून महिन्यातच अलमट्टी धरण ६१ टक्के भरले आहे.
धरणात जवळपास एक लाख क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून, विसर्ग केवळ ७० हजार क्यूसेकने चालू आहे. अलमट्टी धरणातील पाण्याची आवक लक्षात घेतल्यास चार दिवसात धरण ७० टक्क्यांपेक्षा अधिक भरणार आहे.
जुलै, ऑगस्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्यास अलमट्टी धरणाचे अधिकारी पाणी व्यवस्थापन कसे करणार आहेत, असा प्रश्न सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
परिणामी अलमट्टी धरणाच्या पाण्याची फुग कृष्णा नदीच्या महापुराला जबाबदार राहणार आहे. म्हणूनच कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना अलमट्टी धरणातील सध्याच्या पाणीसाठ्याची चिंता वाटू लागली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आहे.
महाराष्ट्राच्या विनंतीलाही फटकारले
• महाराष्ट्र शासन आणि कृष्णा महापूर नियंत्रण समिती, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पेटकर आदींनी पत्राव्दारे अलमट्टी धरण ३१ जुलैपर्यंत ५० टक्केच भरले पाहिजे.
• धरणात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा करू नये, अशा विनंतीची पत्रे कर्नाटक सरकारला पाठवली आहेत. पण, कर्नाटक सरकारने धरणातील पाणीसाठा कमी करण्याऐवजी ६१ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
केंद्रीय जल आयोगाकडूनही दखल नाही
• केंद्रीय जल आयोगाकडेही अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याबाबत तक्रार केली आहे. पण, केंद्रीय जल आयोगानेही अलमट्टी धरण व्यवस्थापनाला पाणीसाठा आटोक्यात ठेवण्याबाबत काहीच सूचना दिली नाही. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
• महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारवर दबाव टाकून पाणीसाठा कमी करण्याबाबत सूचना दिली नाही तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत, असा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा : 'लिंबोणी'ने दिली आयुष्याला कलाटणी; ३० गुंठ्यांमध्ये रानबा खरातांनी साधली आर्थिक प्रगती