पूर्व विदर्भ व मराठवाड्याचा अपवाद वगळता राज्यात मान्सूनने जूनची सरासरी गाठली आहे. अजून दोन दिवस शिल्लक असून सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात जूनमध्ये सरासरी २०८ मिलिमीटर पाऊस पडतो.
त्या तुलनेत शनिवारपर्यंत १९४.३ मिलिमीटर अर्थात ९३.६ टक्के पाऊस झाला आहे.
२५ ते ५० टक्के पाऊस असणाऱ्या तालुक्यांची संख्या ३८ इतकी आहे, तर ७५ ते १०० टक्के पाऊस ८७ तालुक्यांमध्ये झाला असून १५५ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीच्या शंभर टक्क्यांहून अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे.
२८ जिल्ह्यांमध्ये १०० टक्के बरसला
राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ३८ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. यात नागपूर आणि बीड जिल्ह्यांमधील प्रत्येकी पाच तालुक्यांचा समावेश आहे, तर २० जिल्ह्यांमधील ७१ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर ३० जिल्ह्यांमधील ८७ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० पाऊस पडला आहे. १०० टक्क्यांहून अधिक पाऊस २८ जिल्ह्यांमधील १५५ तालुक्यांमध्ये नोंदविण्यात आला.
५३ टक्के पेरण्या पूर्ण
राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३१ हजार हेक्टरवरील (५३ टक्के) खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण २१ दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या केवळ ६१ टक्के तर मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये ८३.६ टक्के पाऊस झाला आहे.
सर्वाधिक पाऊस पुण्यात
सर्वाधिक पाऊस पुण्यात ११३ टक्के, तर कोकण विभागात १०२, नाशिक विभागात १०१, अमरावती विभागात १०८ पावसाची नोंद झाली आहे. यात भंडाऱ्यातील लाखनी व गोंदियातील सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी या तीन तालुक्यांचा समावेश आहे.