Join us

उजनी व वीर धरणातून ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; पंढरपुरात चंद्रभागेला पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:18 IST

उजनी व वीर धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे निरा नरसिंहपूर येथून भीमा नदीत तब्बल ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

पंढरपूर : उजनी व वीर धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे निरा नरसिंहपूर येथून भीमा नदीत तब्बल ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

हे पाणी पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असून पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. 

कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाऊ लागले आहेत. यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पाण्याने चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह लहान मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

वीर व उजनी या धरणांची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीर धरणातून नीरा नदीत, तर उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

वीर धरणातून नीरा नदीपात्रात बुधवारी सायंकाळी १९ हजार ७७५ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे; तर उजनी धरणातून ४३ हजार ३८१ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे.

त्यामुळे हा पाण्याचा विसर्ग रात्री पंढरपूर येथे ६३ हजार क्युसेक इतका असणार आहे. या पाण्याने चंद्रभागा नदीवरील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे, तर वाळवंटातील मंदिरांना पाण्याने वेढा घातला आहे.

छोटी मंदिरे पाण्यात बुडाली आहेत; तर पुंडलिक व इतर मोठी व उंच मंदिरे पाण्यात अर्धी बुडाली आहेत. पाणी महाद्वार, विप्रदत्त घाटाला लागले आहे.

वाळवंटात गस्त सुरूउजनी व वीरमधून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीपरिसरात माणसे व वाहनांना बंदी करण्यात आली आहे. नदी परिसरात कुणीही जाऊ नये म्हणून नगर परिषदेमार्फत स्पीकरवरून गस्त घालत सावध करण्यात येत आहे.

अधिक वाचा: उजनी धरण भरण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता; आजमितीला धरणात किती पाणीसाठा?

टॅग्स :पंढरपूरउजनी धरणधरणपाऊससोलापूरनदीमंदिर