रब्बी हंगामासाठी उजनी धरणातून उजनी मुख्य कालव्यातून सायंकाळी चार वाजता ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. भीमा-सीना जोड कालव्यातून २०० क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ४० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
उजनी मुख्य कालव्यातून सोडण्यात येत असलेल्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करीत तीन हजार क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण नियंत्रण विभागाचा कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी दिली.
सध्या उजनी धरणाचीपाणी पातळी १०० टक्के असून, रब्बी हंगामातील ही पहिली पाळी सोडण्यात येत आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे ७३ लाख रुपये वीज बिल थकीत असून, देखभाल दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये आवश्यक आहेत. सोडण्यात आलेले आवर्तन पुढील दीड महिना २५ फेब्रुवारीपर्यत चालू राहणार आहे.
उजनी डावा व उजव्या कालव्यातून सुमारे ३ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. भीमा सीना जोड कालव्यातून ९०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून, सीना नदीवरील १२ बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. येथील २ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.
