वैभव साळकर
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा माणगा बांबू उत्पादनातील अग्रेसर जिल्हा म्हणावा लागेल. येथे किमान आठ ते दहा हजार शेतकरी आज बांबू शेतीशी जोडले गेले आहेत.
जवळपास पाच हजारहून अधिक ट्रक भरून बांबू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेर पाठवला जातो. एका ट्रकमध्ये सरासरी १२०० काठ्या असतात.
एका बांबू काठीचे किमान ६० रुपये जरी गृहित धरले, तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी किमान ३० कोटी रुपये थेट मिळतात. यात तोडणी कामगार, वाहतूक व इतर बाबींचा विचार केल्यास जिल्ह्याचे एकूण बांबू अर्थकारण जवळपास ६० कोटी रुपयांच्या घरात आहे.
यात बांबूचा होत असलेला स्थानिक वापर बेरजेत धरला, तर आणखीन काही कोटीची भर पडावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या मिळणाऱ्या एकूण कृषी उत्पन्नात बांबू शेतीची ही आकडेवारी लक्षणीय म्हणावी लागेल.
Bamboo Farming Sindhudurg बांबू लागवडीचा ताळेबंद शेती-बागायतीएवढाच किंवा त्याहीपेक्षा अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसते.
बाजारपेठ कुठली?
कोकणातील बांबू प्रामुख्याने मुंबई, पुणे तसेच शेजारील कर्नाटक राज्यात नेला जातो. बांबू व्यावसायिक शेतकऱ्यांकडून खरेदी करतात आणि पुढे दलालामार्फत विक्री केली जाते, नगण्य, मध्यम व मोठा अशा तीन प्रकारांत बांबूची विभागणी केली जाते आणि त्याप्रमाणे दर आकारला जातो.
कोकणात बांबूच्या ८ प्रजाती
जगभरातील विविध १२२ देशांत बांबूच्या एकूण १६६२ प्रजाती आढळतात. सर्वाधिक (७००) बांबू प्रजाती चीनमध्ये असून, त्या खालोखाल ब्राझील (४१०) आणि मेक्सिको (१४०) या देशांत आहेत. स्थानिक १२५ तसेच अन्य देशांतून आणल्या गेलेल्या ११ मिळून भारतात १३६ प्रजाती आहेत. देशातील पूर्वेकडील व ईशान्येकडील राज्ये, मध्य भारतातील काही भाग आणि सह्याद्री पर्वतरांगा हे भारतातील प्रमुख बांबू उत्पादक प्रदेश आहेत. सह्याद्री डोंगररांगांत साधारण २२ प्रजाती आढळतात, तर कोकण प्रदेशात यातील ८ प्रजाती आढळतात.
काय आहे बांबू समृद्धी योजना?
टिश्यू कल्चर बांबू रोपांचा दर अंदाजे २५ रुपये प्रति रोप आहे. शेतकरी बांबू रोपे अगोदर खरेदी करून त्यांची शेतजमिनीवर लागवड करतील. शेतजमिनीवर केलेल्या बांबू लागवडीच्या तपासणीनंतर बांबू रोपांच्या किमतीपैकी शासनाकडून ४ हेक्टर किंवा त्याखालील शेती असलेल्या भूधारकांना ८० टक्के तर ४ हेक्टरपेक्षा अधिक शेती असलेल्या भूधारकांना ५० टक्के सवलतीच्या दराने अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येईल. तसेच उर्वरित बांबू रोपांची किंमत अनुक्रमे २० व ५० टक्केप्रमाणे खर्च हा शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे.
बांबू शेती आमच्यासाठी फायदेशीर ठरत असून, अधिक उत्पन्न देणारी आहे. लहरी हवामानामुळे काजू, आंबा, सुपारी या पिकांमध्ये घट होते. मात्र, बांबूवर हवामानाचा फारसा परिणाम होत नसल्याने उत्पन्न हमखास मिळण्याची शाश्वती असते. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळणे गरजेचे आहे. - समीर देसाई, प्रगतशील शेतकरी