महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नुकतीच नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. त्यात कृषी या कॅटेगरीमध्ये घोडेगाव, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे येथील शेतकरी डॉ. विलास काळे यांची निवड करण्यात आली आहे.
घोडेगाव इनामवस्तीच्या माळरानावर आज परदेशी भाज्यांची हिरवी चादर पसरलेली दिसते. या प्रयोगशील शेतीमागे आहेत डॉ. विलास नथुराम काळे! पुण्यात बी.एस्सी. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॅनडात ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट मिळवली.
अमेरिकेत स्थायिक होण्याच्या संधी असतानाही त्यांनी आपल्या मातीला नवे रूप देण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परदेशी भाज्या येतात तरी कुठून? हा विचार करताना त्यांना एक कल्पना सुचली.
या भाज्या आपणच भारतात, आपल्या शेतात का पिकवू नयेत? तिथूनच सुरू झाला एक धाडसी प्रयोग! सुरुवातीला हवामान, बियाणे आणि बाजारपेठेच्या अडचणी होत्या; पण सातत्याने प्रयोग करत त्यांनी शेती उभी केली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
डॉ. काळे यांच्या शेतात डोकावलात, तर एक वेगळंच जग उघडतं. अमेरिकेत लोकप्रिय असलेली आईसबर्ग लेट्युस, पोषणमूल्यांनी भरलेली ब्रोकली, जगातील अत्यंत तिखट मानली जाणारी चायनीज मास्टर केबल मिरची, ग्रीक-जर्मन-स्पॅनिश-फ्रेंच स्वयंपाकात वापरली जाणारी चिकोरी, युरोपियन लेट्युस या विदेशी भाज्यांची ते शेती करतात.
तसेच अरब देशांत प्रसिद्ध झुकली, मेक्सिकन पाककृतीतील ब्रोकली, रेड रोमन, कांद्यासारखा दिसणारा फेनेल, बडीशेपसदृश स्वाद असलेला हॅबेन, करंगळीएवढे बेबी कॅरेट, कांद्याचा एक प्रकार असलेली लीक, मेंथॉलचा सुगंध असलेली रोजमेरी, अशा तब्बल ९० प्रकारच्या विदेशी भाज्या त्यांच्या शेतात नांदतात.
हवामान, तापमान आणि आर्द्रतेचे अचूक व्यवस्थापन करून या भाज्या पिकवल्या जातात. ऑर्डरनुसार शेतातून भाजी तोडून थेट हॉटेल्सकडे पाठवली जाते. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ हा प्रवास अखंड सुरू आहे.
आज भारतात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना त्यांच्या देशातील चवीचा भाजीपाला भारतीय मातीत उगवलेला, ताज्या स्वरूपात मिळतो आणि त्यामागे आहे डॉ. विलास काळे यांची दृष्टी!
शेती ही केवळ परंपरा नसून, ज्ञान आणि बाजारपेठ यांचा संगम आहे, हे डॉ. विलास काळे यांनी माळरानातून पंचतारांकित थाळीपर्यंतचा प्रवास घडवून दाखवून सिद्ध केले आहे.
