गजानन पाटील
दरीबडची : दुष्काळी भागातील शेतकरी अनेक वर्षांपासून नावीण्यपूर्ण प्रयोग करत आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत, आधुनिक शेतीच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीचा मार्ग स्वीकारत आहेत.
प्रतापूर (ता. जत) येथील माळरानावर आजहरुद्दीन शेख यांनी अंजीर फळबाग फुलवली आहे. १ एकर बागेतून पहिल्या वर्षी ४ टन ५०० किलो उत्पादन मिळाले.
किलोला ८० ते १२० रुपये दर मिळाला. एकरी ३ लाख ६० हजार रुपये मिळाले. अंजीर आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग दाखवणारा ठरला आहे.
प्रतापूर येथील आजहरुद्दीन शेख २०१४ पासून ड्रॅगन फ्रूटची शेती करतात. ड्रॅगनचा दर कमी झाला. पीक बदल करण्याचा निर्णय घेतला. कमी खर्च व कमी नुकसानीचे अंजीर फळाची निवड केली.
पुणे, संभाजीनगर येथील अंजीर शेतीला भेटी दिल्या, जंबो जातीच्या अंजीर लागवडीचा निर्णय घेतला. दुष्काळी भागातील वातावरण अंजीरसाठी पोषक आहे.
अंजीराचा हंगाम डिसेंबरपर्यंत चालतो. जुलै २०२३ मध्ये ६० रुपये प्रमाणे रोपे खरेदी केली. १ एकर क्षेत्रामध्ये १५ बाय १५ फूट अंतरावर २६० रोपाची लागवड केली.
ठिबक सिंचन १५ हजार रुपये, शेण व रासायनिक खत, खड्डे व रोप लावण असे एकूण ४३ हजार रुपये लागवडीला खर्च केला. बागेला ६० टक्के रासायनिक व ४० टक्के सेंद्रिय खतांचा वापर केला.
ठिबक मधून एनपीके खतांच्या मात्रा दिल्या, लागवडीनंतर ८ महिन्यात उत्पन्नाला सुरुवात झाली मात्र ही उत्पन्न जेमतेम मिळाले. एका वर्षानंतर झाडांची छाटणी घेतली. छाटणी नंतर ४ महिन्यात फळ आले. नोव्हेंबर २०२४ फळांची तोडणी सुरू केली.
४ हजार ५०० किलो फळांचे उत्पादन मिळाले. मालाची प्रतवारी करून सांगली बाजारपेठेत १० किलोप्रमाणे बॉक्स पॅकिंग करून पाठविले. किलोला ८० ते १२० रुपये दर मिळाला. ३ लाख ६० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले.
फळझाडांचे आगर
सध्या ५ एकर ड्रॅगन फ्रूट, एक एकर अवॉकहो, एक एकर आंबा फळबाग आहे. शेतात परसिमन, फुटबॉल संत्रा, बोर, चिंच, जांभळ, सीताफळ, सफरचंद, वाटर अॅपल, फणस, चिक्कू, पेरू, काजू, कोकम, आगरवूड फळझाडे आहेत.
गट शेती फायदेशीर
अंजीर शेतीचे १० शेतकऱ्यांचे गटशेती केली आहे. स्वतःपुरते मर्यादित न ठेवता महत्व सांगून आजहरुद्दीन शेख, सागर खांडेकर, वैभव कोपनूर, अश्रफ शेख, समाधान कोपनूर, शरीफ शेख, जमीर मुजावर, सोहेल गडेकरी, निहाल शेख, अशपाक मुजावर यांनी ११ एकर अंजीरची लागवड केली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधने या उद्देशाने गटशेती केली आहे.
शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन, कष्ट व आधुनिक तंत्रज्ञानाचा जोड द्यावी. शेतीमध्ये येणाऱ्या काळात नवनवीन प्रयोग करणे काळाची गरज आहे. - आजहरुद्दीन शेख, अंजीर उत्पादक शेतकरी, प्रतापूर
अधिक वाचा: सोयाबीन पेरणीसाठी बियाणे निवडताना उगवण क्षमता तपासणी का करावी? जाणून घ्या सविस्तर