सुरुवातीला मान्सून पूर्व आणि त्यानंतर मान्सून सक्रिय झाल्यामुळे अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे भात लागवडीची खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत.
पाण्याचा निचरा होऊन जमीन कोरडी होत नाही, तोपर्यंत पेरणी अशक्य आहे. सध्या पाऊस पडत असला तरी तो ऐनवेळी गायब झाल्यास पेरण्याच काय, लागवडसुद्धा अशक्य होईल, अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
त्यावर रहू पद्धतीचा पर्याय अवलंबण्याचा विचार शेतकरी करत आहेत. रब्बी हंगामात पिके घेतलेल्या क्षेत्रात धूळवाफ्यावरील पेरण्या केल्या जातात.
अन्य जमिनीत मात्र अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी पुनर्लागवड पद्धत अवलंबली जाते. त्यासाठी मृग नक्षत्राच्या सुरुवातीच्या पावसात पेरण्या करून लागवड केलेल्या जमिनीची नांगरणी करून ठेवली जाते.
परंतु पावसामुळे सर्वत्र पाणी भरपूर असल्यामुळे पेरणी अशक्य झाली आहे. त्यासाठी पर्याय म्हणून ३६ ते ४८ तास भात भिजवून मोड आलेल्या भाताची पेरणी (रहू) चिखलात केली जाते.
१२ ते १५ सेंटीमीटर उंचीची व २१ ते २५ दिवसांची रोपे काढून पुनर्लागवड केली जाते. सध्या सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे शेतकरी रहू पद्धतीचा अवलंब करण्याच्या विचारात आहेत.
रहू पद्धतीशिवाय चटई पद्धतीचा अवलंबसुद्धा उपयुक्त आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना घराजवळील किंवा शेतघराजवळील कमी पाण्याच्या जमिनीत लागवडीसाठी आवश्यक रोपे तयार करता येणार आहेत.
भात लागवडीसाठी पुनर्लागवड (लावणी) पद्धत अवलंबली जात असल्यामुळे आता कोणता पर्याय वापरावा असा संभ्रमही काही शेतकऱ्यांमध्ये आहे.
हळव्या जातीची पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी यंदा निमगरव्या आणि हळव्या जातीची पेरणी १ जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी.
पावसाने उसंत न घेतल्यास भात बियाण्यांची पेरणी रहू काढून करावी.
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो फार्मर आयडी असेल तरच महाडीबीटी पोर्टलवरून करता येणार योजनांसाठी अर्ज