Farmer Juggad : धुळे जिल्ह्यातील शेतकरी रमाकांत बागूल यांनी कांदा वाफे खाचे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र एकाच वेळी बेड (वाफे) तयार करणे आणि लावणीसाठी खाचा (दांड) पाडण्याचे काम करते. शेतकऱ्याच्या या जुगाडास नाशिकच्या कृषी कुंभमध्ये प्रथम क्रमांक आला आहे. नेमके कशा पद्धतीने हे यंत्र काम करते, याबाबत अनुभव बागुल यांनी सांगितला आहे.
कांदा लागवड करताना प्रामुख्याने गरज पडते ती शेतजमीन तयार करण्याची. यावेळी बैलजोडीच्या सहाय्याने जमीन तयार केल्यास धूऱ्याची उंची कमी असणे. ढेकळे जमा न होणे. या अनेक गोष्टींच्या माध्यमातून किंबहुना बैलजोडीच्या कमतरतेवर एक पर्याय म्हणून या मशीनची निर्मिती झाली. सध्या मजूर टंचाई पाहता कांदा शेत जमीन तयार करणे दुरापास्तच होते.
तरीही एन केन प्रकारे जमीन तयार केल्यास लागवड धारक मजुरांना पाहिजे, त्या प्रमाणात दिशादर्शक खाचा नसल्यामुळे लागवड ही विरळ होत होती. मजुरांच्या या विरळ लागवडीमुळे कांद्यांची रोपसंख्या एकरी किमान १ लाख ७० हजार एवढी बसते. याच मशीनच्या वापरामुळे तेवढ्याच क्षेत्रामध्ये रोपसंख्या ही दोन लाख ४० ते ५० हजार एवढी कमाल वाढते. त्याच माध्यमातून शेतकऱ्याचे उत्पन्न ४० टक्क्यांनी प्रत्यक्ष वाढले.
मजुरांना लागवड करताना दिशादर्शक खाचा असल्यामुळे लागवड ही दाट होते. खाचेमध्ये रोप दाबल्यानंतर पाणी भरताना रोपाला कोणत्याही प्रकारची वाहण्याची शक्यता नसते. रोपाची मूळे मातीत गाडले गेल्यामुळे रोपावर कोणत्याही प्रकारच्या बुरशीजन्य व मर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसून येत नाही. धुरे उंच असल्यामुळे पाणी भरताना वाफा फुटत नाही.
पाणी भरण्यासाठी पर्याप्त दांड असल्यामुळे पाणी भरणा हा सोपा सुटसुटीत होतो. ढेकाळे मुक्त वाफा असल्यामुळे लागवड करताना मजुरांना कोणत्याही प्रकारचे कष्ट पडत नाहीत. अशा माध्यमातून या मशीनची निर्मिती होऊन हजारो शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उत्पादन वाढीचा हा फायदा झालेला आहे. सद्यस्थितीला असलेले कोसळलेले कांद्याचे बाजार भाव व अत्यल्प उत्पन्न यावर या मशीनच्या माध्यमातून उत्पादनातील लक्षणीय फरकामुळे शेतकरी कुठेतरी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडलेला दिसत आहे.
खानदेशात या खाचे यंत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मिती सुद्धा होताना दिसून येत आहे. शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी बनविलेले शेती उपयोगी यंत्र "ही या मशीनची खासियत आहे. टाकाऊतून टिकाऊ जुगाड पद्धतीने निर्माण केलेल्या या बहुपयोगी यंत्राची महती संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे.
नुकताच नाशिक येथे पार पडलेल्या कृषी कुंभ या स्पर्धेत विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून जुगाडू शेतकरी हा प्रथम क्रमांक मिळविला. २५ हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यांच्या या जुगाडू वृत्तीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे सुसह्य व मजूर मुक्त शेतीकडे वाटचाल होताना दिसून येणार आहे. शेतकऱ्यांनी आलेल्या अडचणींवर मात करून शेती सोपी सुटसुटीत व मजूरमुक्त कशी करता येईल, हे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून केले पाहिजे असेही आवाहन गणू दादा हे करतात.
