Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी पडतंय? तुमच्या शेतात 'हा' एकच खड्डा काढा, मुरेल साडेतीन लाख लिटर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:35 IST

हे खड्डे पाणी अडवत असल्याने जमिनीतील सुपीक माती वाहून जाण्यापासून वाचते व जमिनीची धूप थांबते. मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे पिकांच्या उत्पादनात ४२% पर्यंत वाढ झाली आहे.

कूपनलिका आणि विहिरींच्या पाणी पातळीत वाढ करण्यासाठी 'जलतारा' ही एक अत्यंत प्रभावी योजना म्हणून उदयास आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवणे हा आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भूजल आणि विहिरी, कूपनलिकांमधील पाणी पातळी वाढवण्याच्या उद्देशाने प्रत्येक गावातील शेतांमध्ये 'जलतारा' योजना राबविली जाते.

'एल निनो'च्या संकटामुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

जलतारा योजना काय आहे?
◼️ ही योजना प्रामुख्याने 'आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेचे डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी विकसित केली आहे.
◼️ ती आता महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत राबवली जात आहे.
◼️ यात प्रत्येक एकर शेतात उताराच्या जागी एक 'शोषखड्डा' तयार केला जातो.

शोषखड्ड्याचे स्वरूप व मोजमाप आकार
◼️ साधारणपणे ५ फूट बाय ५ फूट किंवा ४ फूट बाय ४ फूट रुंद आणि ६ फूट खोल खड्डा खोदला जातो.

खड्डा भरण्याची पद्धत
◼️ हा खड्डा विशिष्ट थरांनी भरला जातो.
◼️ सर्वांत खाली मोठे दगड, मध्यभागी मध्यम आकाराचे खडे आणि सर्वांत वरच्या थरात वाळू किंवा बारीक खडी टाकली जाते.
◼️ यामुळे पावसाचे पाणी गाळून थेट जमिनीच्या खोलवर असलेल्या थरांपर्यंत पोहोचते.

प्रमुख फायदे
◼️ एका जलतारा खड्याद्वारे एका पावसाळ्यात सुमारे ३.६० लाख लिटर पाणी जमिनीत मुरवले जाऊ शकते.
◼️ यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत सरासरी १४ फुटांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

उत्पादनात वाढ
◼️ मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे पिकांच्या उत्पादनात ४२% पर्यंत वाढ आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
◼️ हे खड्डे पाणी अडवत असल्याने जमिनीतील सुपीक माती वाहून जाण्यापासून वाचते व जमिनीची धूप थांबते.

अनुदान आणि अंमलबजावणी
◼️ मनरेगा अंतर्गत या कामासाठी शेतकऱ्यांना मजुरी स्वरूपात सुमारे ४,८०० रुपयांचे अनुदान मिळते.
◼️ इच्छुक शेतकरी आपल्या गावातील कृषी सहायक किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
◼️ यासाठी ७/१२, ८-अ उतारा, आधार कार्ड आणि जॉब कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

अधिक वाचा: फळमाशीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्याने केले देसी जुगाड; केळीचा सुगंध वापरून केला 'हा' सापळा

English
हिंदी सारांश
Web Title : Jaltara: Dig a pit, recharge well with 3.6 lakh liters!

Web Summary : Jaltara scheme boosts groundwater by channeling rainwater into pits. This increases well water levels and crop yields, offering farmers subsidies and drought resilience through effective water conservation.
टॅग्स :शेतीशेतकरीपाणीपीकदुष्काळपाणी टंचाईआर्ट आॅफ लिव्हिंगसरकारपाऊस