बारामती : आंबा आणि पेरुसारख्या रसाळ फळांना फळमाशीच्या घातक प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी बिहारमधील पाटणा येथील अनुभवी शेतकरी अमरजीत कुमार सिन्हा यांनी अत्यंत स्वस्त आणि प्रभावी 'देसी जुगाड' विकसित केला आहे.
या अभिनव पद्धतीची माहिती बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संतोष गोडसे यांनी परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेअर केली आहे.
फळमाशीमुळे फळे आतून सहून जातात आणि बागायतदारांना तब्बल ९० टक्क्यांपर्यंत नुकसान सहन करावे लागते.
यावर उपाय म्हणून अमरजीत सिन्हा यांनी पिकलेल्या केळी आणि टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून खास 'किड सापळा' तयार केला आहे. या सापळ्याकडे फळमाशा आकर्षित होतात आणि त्यात अडकून नष्ट होतात.
आंब्याच्या बागेत फळे पक्व होण्याच्या काळात फळमाशी मोठा धोका निर्माण करते. ही माशी फळांच्या सालीला छिद्र करून आत अंडी घालते. त्यातून तयार होणाऱ्या अळ्या फळ आतून पोखरतात.
परिणामी शेतकऱ्यांना महागडी आणि विषारी कीटकनाशके वापरावी लागतात. मात्र या देसी उपायामुळे कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने फळमाशीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत आहे.
या सापळ्यासाठी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या कापून त्यामध्ये पिकलेल्या केळीचा चारा ठेवला जातो. त्यात लॅमडा सायहॅलोथ्रीन किंवा मोनोक्रोटोफॉस औषधाचे काही थेंब मिसळले जातात.
पिकलेल्या केळीचा सुगंध फळमाशांना आकर्षित करतो आणि त्या काही तासांत नष्ट होतात. हा ट्रॅप झाडावर टांगल्यानंतर त्वरित कार्यरत होतो आणि त्यातील चारा सुमारे १५ दिवस प्रभावी राहतो.
एका एकरासाठी फक्त २५ ते ३० ट्रॅप पुरेसे ठरतात. विशेष म्हणजे एका ट्रॅपचा खर्च केवळ ३ ते ४ रुपये इतकाच येतो आणि तो ४ ते ५ झाडांसाठी उपयोगी ठरतो.
या पद्धतीमुळे फळमाशीचा प्रादुर्भाव ९० टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याने फळांची गुणवत्ता टिकून राहते आणि बाजारात चांगला दर मिळण्यास मदत होते.
ही पद्धत आंबा आणि पेरुसोबतच जांभूळ, काकडी, भोपळा, दुधी भोपळा यांसारख्या पिकांवरही प्रभावी ठरू शकते. शासनाने या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिल्यास कीटकनाशकमुक्त फळ उत्पादन वाढण्यास मदत होईल. - संतोष गोडसे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
अधिक वाचा: बाजारात केशर आंब्याची आवक सुरु; वाचा गोल्डन केशर आंब्याला प्रतिकिलो काय मिळतोय दर?
