निसर्गतः लिंबूवर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी पावसाळ्यात (जून-जुलै) येणाऱ्या बहारास 'मृग बहार' (मृग नक्षत्रात) येतो.
पावसाळा संपल्यानंतर (ऑक्टोबरमध्ये) येणाऱ्या बहारास 'हस्त बहार' (हस्त नक्षत्रात येणारा) तर थंडी संपतेवेळी (जानेवारी-फेब्रुवारी) म्हणजे आंब्यांना ज्या वेळेस बहार येतो तो 'आंबिया बहार' असे तीन बहार वेगवेगळ्या ऋतुमध्ये येतात.
वरीलपैकी कोणत्या बहाराची फळे घ्यायची हे जमिनीचा प्रकार, झाडांची वाढ, उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता व बाजारातील मागणी, भाव, यावर सर्वस्वी अवलंबून असते. भारी जमिनीत आंबिया बहार तर हलक्या जमिनीत मृगबहार घेतला जातो.
उन्हाळ्यात ओलीताची सोय असल्यास शेतकरी आंबिया बहार घेणे पसंत करतात. हलक्या ते मध्यम जमिनीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात बहार येऊन फळधारणेस सुरुवात होते.
जमीन खोल व भारी असल्यास बहराचा काळ मार्चपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता असते. परंतु मार्च महिन्यात, फेब्रुवारीच्या तुलनेत तापमान जास्त असल्यामुळे फळधारणा व्यवस्थित होत नाही व फळांची अधिक गळ होते.
पावसाळ्याची सुरुवात केव्हा होते यावर मृग बहाराचे यश अवलंबून असते. ताण कमी झाल्यास बहार फुटत नाही व ताणाचा कालावधी वाढल्यास झाडे वाळण्याची शक्यता असते. पानांचा आकार बारीक होतो आणि उत्पादन घटते.
मृगबहार व त्याची फळे पावसाळ्याची दमटपणामुळे झाडावर टिकून राहतात. फळांचे उत्पादन चांगले मिळते. फळे गोड, उत्तम प्रतीची व रसरशीत असतात व रंगही चांगला येतो. म्हणून मृगबहाराला बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो.
विविध बहार, ताण देण्याचा काळ, फुले येण्याचा काळ, काढणी व बहाराची वैशिष्ट्ये
| बहार | ताण देण्याचा काळ | फुले येण्याचा काळ | काढणी | बहाराची वैशिष्ट्ये |
|---|---|---|---|---|
| आंबे बहार | नोव्हेंबर-डिसेंबर | जानेवारी-फेब्रुवारी | सप्टेंबर-ऑक्टोबर | बहार खात्रीचा असतो. फळाचा रंग आकर्षक. प्रत चांगली राहते. भाव चांगला मिळतो. फळ वजनाने जास्त. बागेचे आयुष्य वाढते. फळमाशीचा उपद्रव जास्त. |
| मृग बहार | एप्रिल-मे | जून-जुलै | फेब्रुवारी-मार्च | फळे उत्तम दर्जाची. फळमाशीचा उपद्रव कमी. कमी पाण्यात येते. बागेचे आयुष्य घटते. फळाचा आकार लहान राहतो. बहार खात्रीचा नसतो. |
| हस्त बहार | ऑगस्ट-सप्टेंबर | सप्टेंबर-ऑक्टोबर | एप्रिल-मे | फळे मध्यम दर्जाची. बाग चांगली राहते. भाव चांगला मिळतो. पाण्याचा ताण बसत नाही. बहार खात्रीचा नसतो. |
