शेती ही निसर्गाशी जुळवून घेतलेली कला आहे. शेतकरी आपले संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून ठेवतात, पण जर त्या शेतीतून सातत्याने यश हवे असेल, तर जुन्या पद्धतीत थोडा बदल करावा लागतो.
आजही महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांकडून वर्षानुवर्षे एकाच पिकाची लागवड केली जाते. याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर, जमिनीच्या पोषणतत्त्वांवर आणि रोग-कीड नियंत्रणावर होतो. हे चित्र बदलण्यासाठी 'पीक फेरपालट' हे अत्यंत प्रभावी तंत्र आहे.
पीक फेरपालट म्हणजे एका शेतात दरवर्षी किंवा हंगामागणिक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेणे. उदा. एक हंगाम कापूस घेतल्यानंतर पुढील हंगामात कडधान्य किंवा धान्य घेणे.
यामध्ये मूळ कल्पना अशी की, प्रत्येक पीक जमिनीतील विशिष्ट अन्नद्रव्ये वापरते आणि काही अन्नद्रव्ये परतही देते. त्यामुळे विविध पिकांची लागवड केल्यास जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन राखले जाते.
दरवर्षी एकच पीक घेत राहाल तर नापिकी!
सतत एकाच प्रकारचे पीक घेतल्याने जमिनीतील विशिष्ट अन्नद्रव्यांची कमतरता वाढते. परिणामी, पीक वाढल नाही, झाडे सुकतात आणि उत्पादनात सातत्याने घट होते. ही स्थिती नापिकीच्या दिशेने नेणारी असते.
कापसावर कापूस, मक्यावर मका पिकवू नका!
सतत कापूस किंवा मका घेणे टाळा, अशा प्रकारच्या एकाच पिकाच्या लागवडीमुळे विशिष्ट रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि जमिनीची पोषणशक्ती कमी होते.
नत्र स्थिरीकरणासाठी डाळवर्गीय पिके फायदेशीर!
डाळवर्गीय पिके (मूग, उडीद, चवळी इ.) जमिनीत "रायझोबियम" या सूक्ष्मजिवांच्या साहाय्याने नत्र स्थिर करतात. त्यामुळे जमीन सुपीक होते. त्यामुळे पीक फेरपालट करताना डाळवर्गीय पिकांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
मातीतील अन्नद्रव्ये कमी होतात
प्रत्येक पीक विशिष्ट अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात शोषून घेत असते. उदा. मका नत्राचा जास्त बापर करतो, तर कापूस अधिक फॉस्फरस आणि पोटॅशियम वापरतो. सतत तेच पीक घेतल्यास जमिनीत ही अन्नद्रव्ये संपून जातात.
पीक फेरपालट केल्याचे फायदे
१) जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन
फेरपालट केल्याने विविध पिकांची अन्नद्रव्ये वापरण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे सर्व प्रकारची अन्नद्रव्ये जमिनीत संतुलित राहतात.
२) रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी
वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीमुळे एका विशिष्ट रोग किंवा किडीचा साठा कमी होतो. त्यामुळे रासायनिक फवारणीचे प्रमाणही घटते.
३) उत्पादनात सातत्य आणि नफा
फेरपालट केल्यास जमिनीची उत्पादकता टिकून राहते. परिणामी, उत्पादनात सातत्य येते आणि खर्चात बचत होते.
पीक फेरपालट ही केवळ पारंपरिक शेतीतील बदल नसून, ती शाश्वत शेतीकडे नेणारी दिशादर्शक पद्धत आहे. आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत आणि जमिनीच्या सातत्याने होणाऱ्या घटत्या पोषणमूल्यांमध्ये पीक फेरपालट हा एक प्रभावी उपाय ठरतो.
शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे एकाच पिकावर अवलंबून न राहता, जमिनीच्या प्रकृतीनुसार आणि हवामानाच्या अनुषंगाने पिकांची योग्य फेरपालट करावी.