अनिरुद्ध पाटील
बोर्डी : पालघर जिल्ह्याला मे महिन्यातील अवकाळी वारा-पावसाने झोडपले. या परिस्थितीत हातातोंडाशी आलेले आंबा, काजू, जाम, लिची अशा मोसमी फळांना फटका बसला.
मात्र अशा विपरित परिस्थितीत योग्य व्यवस्थापन आणि बाजारातील लौकिकामुळे डहाणू तालुक्यातील कलिंगड उत्पादकाला तारले.
अशा वादळीवारा पावसाच्या स्थितीतही कलिंगडाचे यशस्वी उत्पादन घेऊन नफ्याची शेती कोसबाड येथील उच्चशिक्षित डॉ. सुमित ढाक यांनी करून दाखवली.
डॉ. सुमित ढाक हे डहाणू तालुक्यातील असून त्यांनी मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायती अंतर्गत पळसपाडा येथे १९ एकरात शेती सुरू केली. या तालुक्यात पहिल्यांदाच व्यापारी तत्त्वावर कलिंगड शेतीला गतवर्षीपासून प्रारंभ केला.
कलिंगड लागवडीसाठी माती व पाणी परीक्षण, मल्चिंग तसेच ठिबक सिंचन, सौर ऊर्जेचा वापर आदी. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून नफ्याची शेती केली होती.
यंदाही त्यांनी कलिंगडाचे पहिले पीक घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४ हजार रोपांची लागवड २५ मार्च रोजी केली होती.
७ टन घेतले उत्पादन
◼️ पालघर जिल्ह्याला ६ मे पासून अवकाळी पावसाने झोडपायला सुरुवात केली. २७ मेपर्यंत सुमारे वीस दिवसांच्या कालावधीत वादळी वारे, चमकणाऱ्या विजा आणि पावसाचा मारा पिकांना बसला; मात्र आधुनिक पद्धतीच्या शेतीमुळे त्यांच्या पिकावर विपरित परिणाम झाला नाही.
◼️ ३० मे रोजी डॉ. ढाक यांनी ७ टन मालाची तोडणी केली असून आणखी तेवढेच उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. गेल्यावर्षी सुद्धा त्यांनी जास्त बाजारभावाकडे न पाहता डहाणू शहरातील फळ विक्रेत्यांना दिले होते.
◼️ फळांचा आकार, चव आणि बाजारातील पत राखण्यात ते यशस्वी ठरले होते. एकीकडे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अनेक कलिंगड विक्रेत्यांनी दुकाने बंद केली असताना चांगल्या व्यवहारामुळे व्यापाऱ्यांनी ढाक यांची फळे घेतली.
अभियांत्रिकी क्षेत्रात डॉक्टरेट
डॉ. ढाक हे मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी क्षेत्रात डॉक्टरेट मिळविणारे देशातील सर्वांत लहान वयाचे आदिवासी समाजातील तरुण तसेच इनस्पायर अवॉर्ड, जेआरएफ अवॉर्ड, राज्य शासनाच्या आदिवासी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित आहेत.
अधिक वाचा: अतिवृष्टी झाली असेल तर भात लागवडीसाठी ही पद्धत ठरेल फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर