गोंदिया जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्चा प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाने १८ नोव्हेंबरला शासनाकडे पाठविला आहे.
त्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ४९ हजार १६४ हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले असून १ लाख ३२ हजार ८४४ बाधित झाले असून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे ७८ कोटी १३ लाख ५९ हजार ६६५ रुपयांची मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली होती.
धानपिकांसाठी अनुकुल वातावरण असल्याने धानाचे पीक सुध्दा चांगले होते. मात्र खरीपातील हलक्या धानाची कापणी आणि मळणी सुरु असताना ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने सलग आठ दिवस हजेरी लावली. त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने धानाला कोंब फुटली. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभा धान आडवा झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा हलक्या धानाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्याचीच दखल शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेला दिल्या.
नुकसानीचे पंचनामे करण्यास जळवपास २० ते २५ दिवस लागले. यानंतर कृषी विभागाने नुकसानीचा अंतिम अहवाल तयार केला आहे. यात जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ४९ हजार ११६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले असून त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ७८ कोटी १३ लाख ५९ हजार ६६५ रुपयांची मागणी शासनाला पाठविलेल्या अहवालातून केली आहे.
अवकाळीमुळे तालुकानिहाय धानपिकांचे झालेले नुकसान
| तालुका | एकूण बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र | अपेक्षित निधी |
| गोंदिया | ५६७१८ | १७१२५ | २९,११२५००० |
| गोरेगाव | ८००३ | ३१३९.८० | २६६८८३०० |
| तिरोडा | २६०५२ | ११०५२.८७ | १८७९१५७९० |
| अर्जुनी मोर. | १३४१ | ६७४.५५ | ५५०४१७५ |
| देवरी | ५५८२ | २६१७.४४ | २२२४८२४० |
| आमगाव | १७५५८ | ७२१६.०४ | १२२६७९२८० |
| सालेकसा | ११८५७ | ४६४८.९४ | ७९०३१९८० |
| सडक अर्जुनी | ५७१० | २७१५.७० | ४६१६६९०० |
| एकूण | १,३२,८४४, | ४९१६४.३४ | ७८१३५९६६५ |
मदतीकडे लागले लक्ष
• अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान चार तालुक्यांत झाले आहे. गोंदिया १७ हजार १२५ हेक्टर, तिरोडा ११५३ हेक्टर, आमगाव ७२१६ हेक्टर, सालेकसा तालुक्यात ४६४८ हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले आहे.
• जिल्हा प्रशासनाने अवकाळी पावसामुळे धानपिकांच्या झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठविला आहे.
सर्वाधिक नुकसान चार तालुक्यांत
त्यात १ लाख ३२ हजार ८४४ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ७८ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली असून मदतीची रक्कम खात्यावर केव्हा जमा होते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
