नवी मुंबई : वाढत्या तापमानासोबत लिंबाचे दरही चढू लागले आहेत. उन्हाचा तडाखा वाढताच लिंबाची मागणी वाढली असून बाजारात भाव तेजीत आहेत.
आठवडाभरापूर्वी ६० ते ७० रुपये किलोने मिळणारे लिंबू आता ९० ते १०५ रुपयांपर्यंत पोहोचले. किरकोळ बाजारात एक लिंबू ३ रुपयांवरून थेट ५ ते ६ रुपयांपर्यंत विकले जात आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सुमारे ४५ टन लिंबांची आवक झाली. महाराष्ट्रातील हंगाम संपल्याने सध्या तामिळनाडूमधून त्यांची आयात होत आहे. उन्हाळ्यामुळे रोजच्या आहारात वाढलेल्या लिंबाच्या वापरामुळे मागणीत वाढली आहे.
ताज्या लिंबाला बाजार समितीत ९० ते १०५ रुपये किलो असा दर मिळत आहे. तर कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेल्या या लिंबाची विक्री ५० ते ६० रुपये किलोने होत आहे.
मागणी वाढल्याने दर तेजीत
◼️ किरकोळ बाजारात आठवडाभरापूर्वी १० रुपयांना ३ लिंबू मिळत होते. आता एकासाठी ५ ते ६ रुपये मोजावे लागत आहेत.
◼️ संपूर्ण उन्हाळ्यात मागणी कायम राहण्याची शक्यता असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
◼️ उन्हाळ्यामुळे लिंबाला मागणी वाढली आहे. महाराष्ट्रातील हंगाम संपला असून सध्या चेन्नईकडून पुरवठा होत आहे.
◼️ मागणी वाढल्याने दर तेजीत आहेत अशी माहिती विक्रेते गौरव केशरवानी यांनी दिली.
एका नगाला ६ रुपयांचा दर; उन्हाळ्यात दक्षिणेकडून पुरवठा
◼️ देशातील लिंबू उत्पादनात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो.
◼️ जून ते फेब्रुवारीदरम्यान अहिल्यानगर, सोलापूर आदी जिल्ह्यांतून देशभर लिंबाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.
◼️ मात्र, मार्च ते मे या कालावधीत तामिळनाडू व इतर दक्षिणेकडील राज्यांवर पुरवठ्याची जबाबदारी असते.
◼️ त्यामुळे दक्षिणेकडील आवकवर बाजारभाव अवलंबून राहणार आहेत. सध्या लिंबाला ६ रुपये प्रतीनग असा दर आहे.
अधिक वाचा: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा घडविला इतिहास; केला 'हा' सर्वाधिक मोठा विक्रम
