कोल्हापूर : तापमान वाढीमुळे संपूर्ण महाराष्ट्र घामाघूम झाला आहे, त्यामुळे शीतपेयांच्या मागणीत वाढ झाल्याने साखरेचे दर थोडे वधारले आहेत.
घाऊक बाजारात 'एम' साखरेचा भाव प्रतिक्विंटल ३८१० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मध्यंतरी युद्धामुळेहॉटेलसह सर्वच व्यवसायांना गॅस टंचाईची झळ बसली, त्यामुळे साखरेची मागणी कमी झाली होती.
पण आता युद्धाचे ढग निवळण्यास सुरुवात झाली आहे. देशातील साखरेचा साठा आणि भविष्यातील मागणी याचा ताळमेळ घातला तर ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
यंदा सप्टेंबर ते फेब्रुवारीअखेर अधूनमधून पाऊस राहिला, त्याचा परिणाम साखरेच्या खपावर झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ अखेर साखर विक्रीचे प्रमाण कमी दिसत आहे.
यंदा उष्मा वाढल्याने फेब्रुवारी व मार्चमध्ये साखरेची मागणी वाढेल, अशी अपेक्षा होती; पण या कालवधीत इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक बाजारपेठ अस्थिर झालीच, त्याचबरोबर देशांतर्गत बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला.
गॅस टंचाईमुळे हॉटेलसह इतर व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे साखरेची मागणी कमी झाली होती, मात्र आता उष्मा वाढला आहे.
त्यामुळे शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली असून, गॅसचा पुरवठा हळूहळू सुरळीत होऊ लागल्याने साखरेची मागणी वाढू लागली आहे. क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ दिसत आहे.
४२ लाख टन साखर शिल्लक
राज्यातील साखर कारखान्यांकडे सध्या उत्पादनाच्या ३५ टक्केच साखर शिल्लक दिसत आहे. त्यामुळे ४२ ते ४५ लाख टन साखर शिल्लक आहे. देशांतर्गत पातळीवर अशीच स्थिती आहे
मे महिन्याचा कोटा २२.५० लाख टन
केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांना मे २०२६ मध्ये विक्री करण्यासाठी कोटा निश्चित करून दिला आहे. मार्चपेक्षा सुमारे ५० हजार टनाने कोटा कमी केला असून, २२ लाख ५० हजार टन साखर विक्री करता येणार आहे.
गॅस टंचाईमुळे साखरेच्या मागणीवर परिणाम झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे; पण सध्याची शिल्लक साखर, आगामी हंगामातील उत्पादन आणि मागणी पाहता आगामी काळात दरवाढीची शक्यता आहे. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ
अधिक वाचा: एल-निनोचा प्रभाव तरीही राज्यात मान्सून वेळेवरच येणार; वाचा जेष्ठ हवामानतज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज
