पुणे : महाशिवरात्र निमित्ताने रताळ्यांना शहर व उपपनगरातून मोठी मागणी असते. यंदा महाशिवरात्री रविवारी (दि. १५) असल्याने या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड बाजारात रताळींची आवक सुरू झाली आहे.
बाजारात साधारण पाच हजार पोती रताळींची आवक होत असून मागील वर्षीच्या तुलनेत आवक आणि भाव स्थिर आहेत.
सध्या बाजारात दाखल होणाऱ्या रताळींना शहरासह जिल्ह्यातून मागणी असल्याचे मार्केटयार्डातील ज्येष्ठ आडतदार अमोल घुले यांनी सांगितले. घाऊक बाजारात सातारा जिल्ह्यातील कराड आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर भागातून आवक सुरू झाली आहे.
दोन्ही भागातून होणारी गावरान रताळीला किलोला ३५ ते ४० रुपये, तर पंढरपूर भागातील रताळीला किलोला २० ते २५ रुपये भाव मिळत आहे.
कर्नाटक येथील बेळगाव भागातून अद्याप रताळींची आवक सुरू झालेली नाही. झाल्यास नग्यण प्रमाणात होईल, असे सांगण्यात येत आहे.
कराड भागातील रताळी लालसर, चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसासयाला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या रताळीला जास्त मागणी असते.
परिणामी, या रताळींना इतर रताळांच्या तुलनेत जास्त भाव मिळतो. पंढरपूरची रताळीला दिसायला पांढरी, तुलनेने आकाराने लहान असतात.
यंदा पाणी, पोषक वातावरण असल्यामुळे रताळींचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यास भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. - महादेव शिंदे, शेतकरी, पंढरपूर, जि. सोलापूर
महाशिवरात्री दिवशी उपवास करण्याचे प्रमाण मोठे आहे. उपवासासाठी रताळीला जास्त मागणी असते. परिणामी आवक व मागणी वाढली असून दर मात्र सामान्यांना परवडणारे असल्याने शेतकऱ्यांना व ग्राहकांना दिलासा मिळत आहे. - अमोल घुले, माजी उपाध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन
अधिक वाचा: राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प मार्गी लागणार; ८ लाख हेक्टर शेती ओलिताखाली येणार
