सोलापूर : चार हजारांच्या आसपास सलग तीन वर्षे दर राहिलेला दर यंदा पाच हजारांच्या पुढे गेला आहे. दरात वाढ होईल, या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन दरात वाढ होत नसल्याने मिळेल त्या दराने विकावे लागले.
आता चांगला दर मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही. अर्ध्या सोलापूर जिल्ह्याचे सोयाबीन हे प्रमुख पीक बनले आहे.
बार्शी, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तसेच माढा व मोहोळ तालुक्यांच्या काही भागात शेतकरी सोयाबीन पीक घेतात. पावसावर अवलंबून असलेले सोयाबीन कमी पावसातही चांगल्या पद्धतीने हाताला लागते.
मात्र, सलग तीन वर्षे बाजारात दर मिळत नव्हता. दरात वाढ होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अनेक वर्षे सोयाबीन घरात ठेवले होते. दर काही वाढत नव्हता व व्यापारी बाजार भाव वाढेल, असे सांगत नव्हते.
शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना घरात ठेवलेले सोयाबीन विक्री केल्याशिवाय पर्याय नसल्याने ते विक्री करून शेतकरी मोकळे झाले आहेत. आता शेतकऱ्यांकडे सोयाबीन नसताना विक्री दरात वाढ झाली आहे.
त्यावेळी होता ४ हजारापेक्षा अधिक दर
◼️ गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढत दीड लाख हेक्टरवर पोहोचले आहे. सुरुवातीस दोन वर्ष निसर्गाने साथ दिली नाही.
◼️ सोयाबीनचे उत्पादन चांगले आले होते, त्यावेळी सोयाबीनला बाजारात ४ हजारापेक्षा अधिक दर मिळत होता.
◼️ मात्र या तीन वर्षात अतिवृष्ठीमुळे सोयाबीन उत्पादन येत नाही व दरही मिळत नाही असे चित्र आहे.
◼️ जिल्ह्यात दराच्या परस्थितीमुळे पुढील वर्षी सोयाबीन क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
◼️ सोयाबीन पीक हे नगदी असले तरी गरीब शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणारे आहे.
◼️ या शेतकऱ्यांना पाण्याची अडचण आली तरी केवळ पावसाळ्यातील पाण्यावरही हे पीक येऊ शकते.
◼️ इतकेच नव्हे गरिबांना आहारात प्रोटीन देणारे म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते.
◼️ मात्र सोयाबीनच्या दरावरून अलिकडे सातत्याने चर्चा होत आहे. अतिवृष्टीतून सावरलेल्या शेतकऱ्यांनाही अपेक्षित दर मिळावेत, असे वाटते.
१२०० ने दर वाढला
◼️ मागील महिनाभरात एक हजार ते बाराशे रुपयाने सोयाबीन विक्री दर वाढला आहे.
◼️ चार हजाराच्या आसपास असलेला दर सध्या पाच हजारांहून अधिक झाला आहे.
◼️ बहुतांशी शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसल्याने सध्या बाजारात असलेला दर काही दिवस असाच राहण्याचा अंदाज व्यापारी वर्गातून केला जात आहे.
सोयाबीन दराचा बाजार सध्या पाच हजारांहून अधिक आहे. मागील काही दिवसांपासून दरात वाढ झाली आहे. सध्याचा दर स्थिर राहील की कमी अधिक होईल, हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसल्याने आवक कमीच आहे. तीन वर्षांनंतर सोयाबीन विक्री दरात वाढ झाली. - राजाभाऊ गवसणे, आडती, वैराग
यंदा सतत अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन उत्पादन चांगले आले नाही. उत्पादन नसताना आता सोयाबीन दरात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन चार हजारांपेक्षा कमी दरात विक्री करावे लागले. या वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना फायदा कमीच आहे. - सुदर्शन साठे, शेतकरी, बीबीदारफळ
अधिक वाचा: शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर
