सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय अखेर अधिसूचनेद्वारे जाहीर केला आहे.
जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी या निर्णयाचे आदेश जारी केले. आत्तापर्यंत चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली समितीच्या त्रिभाजनाची मागणी करत होते.
अखेर सांगली बाजार समितीचे त्रिभाजन झाल्याने व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे. बाजार महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम ४४(१) अंतर्गत हा आदेश जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी सोमवारी काढला आहे.
या निर्णयानुसार विद्यमान सांगली बाजार समितीचे विभाजन करून कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली (मिरज तालुका), कृषी उत्पन्न बाजार समिती कवठेमहांकाळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जत अशा तीन स्वतंत्र बाजार समित्या कार्यान्वित होतील.
कवठेमहांकाळ व जत येथे स्वतंत्र समित्या नव्हत्या, त्यामुळे या दोन्ही तालुक्यांचा समावेश करून नव्या समित्या स्थापन केल्या आहेत. विभाजनास विरोध दर्शवला असला तरी पणन मंडळाने विभाजनास संमती दिली.
पदाधिकाऱ्यांची उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असली तरी कोणतीही स्थगिती नसल्याने शासनाने पुढील कार्यवाही सुरू ठेवली आहे.
सांगली बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त
◼️ सांगली बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून प्रशासकांकडे कारभार सोपविण्यात आला आहे.
◼️ राजपत्रात प्रसिद्धी झाल्यानंतर विभाजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असून, तिन्ही बाजार समित्यांचे कामकाज अधिनियम १९६३ व नियम १९६७ नुसार चालविले जाणार आहे.
◼️ या निर्णयामुळे स्थानिक शेतकरी, व्यापारी व बाजार व्यवस्थापनात अधिक कार्यक्षमता आणली जाईल, असे सांगली वाजार समितीचे प्रशासक सुनील चव्हाण यांनी म्हटले.
व्यापाऱ्यांचे परवाने नव्या बाजार समितीचेच
◼️ सर्व परवानाधारक व्यापारी व घटक नव्या कार्यक्षेत्रातील समित्यांचे परवाना धारक म्हणून मान्य केले जाणार आहेत.
◼️ कर्मचारी विद्यमान पर्दावरच नव्या समित्यांमध्ये कार्यरत राहतील.
◼️ पुढे सेवक संरचनेनुसार स्वतंत्र नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत.
प्रशासकांकडून होणार मालमत्तांचे वाटप
◼️ सांगली बाजार समितीच्या विभाजनानंतर मालमत्तेचेही वाटप करण्यात आले आहे.
◼️ सांगली व मिरज परिसरातील मुख्य आणि दुय्यम बाजार आवार सांगलीकडे राहतील
◼️ तर कवठेमहांकाळ व ढालगाव येथील आवार नव्या कवठेमहांकाळ समितीकडे राहतील
◼️ तसेच जत, माडग्याळ व उमदी येथील आवार जत समितीकडे वर्ग करण्यात येणार आहेत.
◼️ संबंधित स्थावर व जंगम मालमत्ता हस्तांतरणाची जबाबदारी सांगली बाजार समितीच्या प्रशासकांवर असणार आहे.
विभाजनाच्या निर्णयानंतर सांगलीत जल्लोष
◼️ सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या निर्णयाचे शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले.
◼️ सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकारी आणि व्यापारी बांधवांनी आतषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
◼️ यावेळी अध्यक्ष अमरसिंह देसाई, उपाध्यक्ष दीपक चौगुले, मानद सचिव समीर साखरे, आप्पासो पाटील, शरद शहा, गोपाल मर्दा, अशोक पाटील, अभय मगदूम, विकास मोहिते उपस्थित होते.
प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे. दिवंगत मदन पाटील यांनी त्रिभाजनासाठी खूप प्रयत्न केले होते. आ. सुधीर गाडगीळ यांनी खूप प्रयत्न केल्यामुळे त्रिभाजन झाले असून व्यापाऱ्यांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे व्यापाराला गती मिळून बाजार व्यवस्थापन सक्षम होईल. - अमरसिंह देसाई, अध्यक्ष, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स
बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल अजून दोन वर्षे आहे. त्यापूर्वीच संचालक मंडळ बरखास्त केल्यामुळे अन्याय झाला आहे. म्हणूनच शासनाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल केली. - आनंदराव नलवडे, सभापती, सांगली बाजार समिती
अधिक वाचा: शेतजमिनींच्या वाटणीवरून होणारे वाद आता मिटणार; फक्त २०० रुपयांत करून घ्या 'ही' मोजणी
