कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी ३० टक्के वाढ झाली आहे. हंगामात सततचा राहिलेला पाऊस त्यातून मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने आवक मंदावली आहे.
त्यामुळे यंदा लाल मिरची ग्राहकांच्या जिभेला चटका देणार, हे निश्चित आहे. गेल्यावर्षी मिरचीचे पीक मुबलक झाल्याने आवक वाढली होती.
अखंड हंगामात 'ब्याडगी' मिरचीचा भाव ३५० रुपयांच्या (एक नंबर माल) पुढे गेला नव्हता. मात्र आता सरासरी दरात ३० टक्के वाढ झाली आहे.
मात्र, यंदा खरीप हंगामात मिरचीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना पावसाने झोडपून काढल्याने फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे राज्यभरात 'ब्याडगी' सह सर्व प्रकारची मिरचीची आवक कमी झाली आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटकातून आवक
◼️ कोल्हापूर जिल्ह्यात साधारणतः जानेवारी ते मे असा लाल मिरचीचा हंगाम असतो.
◼️ या काळात मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी होते.
◼️ आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व गुजरात येथून मिरचीची आवक होते.
◼️ त्यातही गुजरातमधून खूप कमी प्रमाणात असते.
मिरचीचे दर (प्रति किलोमध्ये)
'केडीएल' ब्याडगी : ३०० ते ६००
संकेश्वरी जवारी (ओरिजनल) : ११०० ते १२००
तेजा : २५० ते ३५०
गुंटूर : ३०० ते ३५०
सिजेंटा : ४०० ते ५००
गरुडा : २५० ते ४००
सततच्या पावसामुळे यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. दर वाढल्याने ग्राहकांनी आतापासूनच मिरची खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. - राजेंद्र जंगम, मिरची व्यापारी, सांगरूळ
यंदा आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली असून आता जुना मालही बाजारात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना काळजी घ्यावी. - सुनील अस्वले, मिरची व्यापारी, कोल्हापूर
अधिक वाचा: देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज; केद्र सरकार कर्जमाफी करणार का?
