सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. मंगळवारी बाजार समितीमध्ये ५०० ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता.
किमान दर १००, कमाल दर ३०००, तर सर्वसाधारण दर १२५० एवढा मिळाला. चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
दरम्यान, मंगळवारी ४९८ ट्रकमध्ये ८९ हजार ६४२ पिशव्यात ४४ हजार ८२१ क्विंटल कांदा बाजारात दाखल झाला होता. या कांदा बाजारात मंगळवारी एका दिवसात ५ कोटी ६० लाख २६ हजार २५० रुपयांची उलाढाल झाली आहे.
कांदा वगळता इतर फळभाज्यांची आवक आणि मागणीही वाढली आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने दर स्थिर राहतील की वाढतील, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
शेतकऱ्यांनी अर्धवट वाळलेला, कच्चा कांदा विक्रीसाठी आणू नये, वाळलेला व पूर्ण वाढ झालेला कांदा आणावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
सध्या कांदा निर्यात होत असल्याने कांद्याला चांगला भाव मिळत आहे. बियाणं तयार करण्यासाठी कांद्याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने व्यापारी सांगतात.
जुना कांदा संपला.. नवा कांदा बाजारात...
◼️ जुना कांदा संपत आल्याने नवीन कांदा बाजारात येत आहे, जो हलक्या ते चांगल्या प्रतीचा आहे. चांगल्या मालाला चांगला भाव मिळत आहे.
◼️ सोशल मीडियावरील माहितीवर विसंबून न राहता, प्रत्यक्ष बाजारभाव तपासून आणि व्यापाऱ्यांच्या चालींकडे लक्ष देऊनच माल विकण्याचा सल्ला दिला जात आहे.
राज्यात सर्वाधिक दर सोलापुरात
◼️ सध्या राज्यातील इतर बाजार समित्यांमधील कांद्याची उलाढाल व भाव पाहिला असता सोलापूर येथील बाजार समितीमध्ये कांद्याची सर्वाधिक उलाढाल होत असून, भावही चांगला मिळत आहे.
◼️ सोलापुरातील शेतकरी हे कांदा विक्रीसाठी हैदराबादचे मार्केट गाठत आहेत. त्याठिकाणी चांगला भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
अधिक वाचा: विठ्ठलराव कारखाना दर दहा दिवसाला जमा करणार उसाचे बिल; प्रतिटन किती दिला दर?
