नाशिक : सध्या लाल आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव (Kanda Bajarhav) दररोज कोसळत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दीड-दोन महिन्यापासून कांदा दारात घसरण सुरु आहे. तर मागील पंधरा दिवसांत जवळपास २८ टक्के घसरण झाली आहे. सद्यस्थितीत लाल कांद्याला क्विंटलमागे १५०० ते १७०० रुपयांवर येऊन ठेपला आहे.
नाशिक, सोलापूर जिल्ह्यासह (Solapur Kanda Market) राज्यात कांद्याच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कांद्याची आवक सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याने मागणी आणि पुरवठ्यातील असमतोलामुळे बाजारभावात मोठी घसरण होत आहे. पाकिस्तानमधून दुबई आणि भारताच्या तुलनेत कमी किमतीत कांदा निर्यात (Kanda Niryat) केला जात आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची मागणी लक्षणीय प्रमाणात घटली आहे.
अवघ्या १५ दिवसांत २८ टक्के घसरण
लाल (खरीप) कांद्याचा किमान दर १ हजार रुपये व जास्तीत जास्त दर २ हजार ६८० रुपये तर सर्वसाधारण दर २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल होता. मात्र सोमवार, दि. १० मार्च रोजी उन्हाळ कांद्याचा किमान दर ८०० रुपये, जास्तीत जास्त दर २ हजार २०१ रुपये व सर्वसाधारण दर १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल निघाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण दर घटून १८०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. म्हणजेच कांद्याच्या दरात अवघ्या १५ दिवसांत सुमारे २८ टक्के (६०० रुपये प्रति क्विंटलची) घसरण झाली आहे.
बाजारभावात मोठी घसरण
कांदा बाजारभावात सातत्याने घसरण सुरु आहे. कांदा दराचा आणि निर्यात शुल्काचा मुद्दा विधिमंडळातही गाजला. मात्र यावेळीही शेतकऱ्यांना आश्वासन, घोषणांचा पाऊस पाहायला मिळाला. यात शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर द्यावा, असा सल्लाही देण्यात आला. दुसरीकडे शेतकरी कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क हटवावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.