कांद्याची दर परवड कायम असून हजार रूपये प्रतिक्विंटलच्या आतच आता दर आहेत. गेल्या महिन्याभरापासून सातत्याने दराची घसरण सुरू असल्याने रोषही व्यक्त होत आहे. उन्हाळ कांद्याची दरदिवशी मोठी आवक होत असली तरी, शेतकऱ्यांची झोळी मात्र फाटकीच असल्याचे दिसून येते.
नाफेडकडून कांदा खरेदीचे सूतोवाच देण्यात आले असले तरी, खान्देशात हे खरेदीकेंद्र फक्त सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात आहे. यामुळे नाफेडकडे कांदा विकल्यास शेतकऱ्यांना वाहतुकीचा भूर्दड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे चाळीसगावातच नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सुरु करावी, अशीही मागणी शेतकऱ्यांमधून आता पुढे आली आहे.
अनुदानाऐवजी नाफेडकडून खरेदी
• एप्रिलमध्ये उन्हाळ कांद्याचे दर प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये होते. आता ते एक हजार रूपयांच्या आतच आहेत. गत महिन्याभरात यात वाढ न होता पडझडचं सुरु आहे.
• त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्यावर अनुदान मिळण्याची अपेक्षा होती. तथापि, नाफेडकडून प्रतिकिलो १२ रुपये ३० पैसे दराने कांदा खरेदीचे सुतोवाच झाले आहे.
• नाफेडकडून खरेदी होणार असली तरी, प्रतिवारीनुसारच भाव मिळणार आहे. त्यामुळे याचा थेट अत्यल्प शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षापासून कांदा रोप दरात मोठी वाढ झाली असून लागवडीचा खर्चही वधारला आहे.
• या तुलनेत मिळणारे दर मात्र कमी आहे. घाऊक बाजारात कांद्याच्या दरात तेजी नसली तरी, किरकोळ बाजारात मात्र तो भाव खाऊन आहे. प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने तो विकला जात आहे.
खान्देशात नाफेडचे खरेदी केंद्र फक्त नाशकात
• गेल्या काही वर्षात खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. लागवडीचा नाशिक पैटर्न तर गिरणा पट्ट्यातही यशस्वी झाला आहे. मात्र या तुलनेत भाव मिळत नाही. अशी शेतक-यांची ओरड असते.
• नाफेडकडून कांदा खरेदी करण्याचे सुतोवाच अलिकडेच झाले आहे. त्याचा दर १२ रुपये ३० पैसे असा असणार आहे. मात्र नाफेडचे खरेदी केंद्र हे नाशिकसह अहिल्यानगरातच असल्याने एवढ्या लांब अंतरावर कांदा विक्रीसाठी नेणे, शेतकऱ्यांना परवडणारे नाही.
• इंधन दरात मोठी वाढ झाल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळेचं नाफेडच्या खरेदी केंद्रावर कांदा विक्रीसाठी नेणे आर्थिकदृष्ट्या योग्य नसल्याचा सूर आहे.
सोमवारी मोठी आवक, भाव कमीच
गेल्या १५ दिवसांपासून चाळीसगावच्या कांदा मार्केट मध्ये सात ते आठ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. एक मे पासून मात्र दर हे १०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल असे स्थिर आहे. सोमवारी १५५ वाहनांमधून ४५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. लिलाव मात्र १०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल असेचं पुकारले गेले.
१०० ते १ हजार रुपयांचा भाव
मार्चनंतर बाजार उन्हाळ कांद्याचे आगमन होते. टिकणारा कांदा, अशी ओळख असल्याने ग्राहकांकडून खरेदीला पसंती दिली जाते. भाव चांगले येतील म्हणून शेतकरी देखील हा कांदा चाळीत साठवून ठेवतात. कांदा मार्केटमध्ये दररोज कांद्याची आवक होत असली तरी, प्रतिक्विंटल १०० ते १००० रुपये असा अत्यल्प भाव मिळत आहे.
