सोलापूर : दिवसरात्र राबराब राबतोय...बाजारातकांदा आणल्यावर रात्रभर जागतोय... गाडीचे भाडे, हमाली, तोलाई निघेना... एकरी कांद्याला ८० हजार रुपये खर्च येत असताना फक्त २० हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.
अशातच गुरुवारी लिलावावेळी भावात चढ-उतार होत असल्याचे लक्षात येताच काही शेतकऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, प्रशासनाने समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले.
दरम्यान, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मागील आठवड्यापेक्षा यंदाच्या आठवड्यात कमी झाली आहे. वातावरण बदलामुळे शेतकरी एकीकडे धास्तावला असताना दुसरीकडे शेतातील पिकांना योग्य भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
सरकारी धोरणाचा परिणाम शेतीपिकांच्या दराला कारणीभूत ठरत असल्याचे शेतकरी सांगतात. मेहनत, खर्च अन् उत्पन्नाचा ताळमेळ घातल्यास शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडत असल्याचे दिसून येत आहे.
७०० रुपयांचा भाव पोहोचला ११२० वर
◼️ लिलावापूर्वी ७०० रुपये भाव मिळेल, असे सांगण्यात आले होते.
◼️ शेतकऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर बाजार समिती प्रशासनाने त्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून पुन्हा लिलाव घेण्यास सुरुवात केली.
◼️ लिलावावेळी ११२० रुपयांचा भाव मिळाला. चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
२ कोटी २९ लाखांची गुरुवारी झाली उलाढाल
◼️ श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी ३२६ ट्रक कांद्याची आवक झाली.
◼️ किमान १००, कमाल १५०० तर सर्वसाधारण दर ७०० रुपये एवढा मिळाला.
◼️ ६५ हजार ३६८ पिशव्या, ३२ हजार ६८४ क्विटंल कांद्यातून २ कोटी २८ लाख ७८ हजार ८०० रुपयांची उलाढाल कांदा बाजारातून झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने 'लोकमत'शी बोलताना दिली
मागील पाच दिवसांतील कांद्याची आवक
तारीख - ट्रक - कमाल भाव
२६ फेब्रुवारी - ३२६ - १,६००
२५ फेब्रुवारी - ३७८ - १,७१०
२४ फेब्रुवारी - ४१६ - १,८००
२३ फेब्रुवारी - ४८० - २,०००
२१ फेब्रुवारी - ४५६ - २,०००
शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. अधिवेशनात शेतकऱ्यांचे मुद्दे असलेला एकही प्रश्न उपस्थित केला जात नाही. सरकार शेतकरी विरोधी आहे. - अण्णा गायकवाड, शेतकरी
