पुणे : अक्षय तृतीयेला आंबा खाण्याची आणि देवाला नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत.
आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच अक्षय तृतीयेला आंब्याला सर्वाधिक भाव मिळत असल्याने अक्षय तृतीयेला आंबा घरी आणण्यासाठी प्रतिडझन ८०० ते १५०० रुपये मोजावे लागणार आहेत.
यंदा कोकणातील हापूस आंब्यांवर वातावरणातील बदलांचा परिणाम झाला आहे. यामुळे उत्पादन कमी झाले आहे.
दर वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ५० टक्क्यांनी मार्केटयार्ड गुलटेकडी घाऊक आवक फळबाजारात कमी झाल्याने आंब्याचे भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
घाऊक बाजारात सध्या पाच ते सात डझन (कच्च्या) आंब्यांचे दर तीन हजार ते सहा हजार आहेत, तर तयार आंबा पाच ते सात डझन आंब्यांची पेटी ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपयांना विक्री होत आहे.
यंदा ३० ते ५० घटली टक्क्यांनी आवक
◼️ दरवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांची आवक घटली आहे.
◼️ घाऊक बाजारात सध्या दिवसाला सात ते आठ हजार पेट्यांची आवक होत आहे.
◼️ दरवर्षीच्या तुलनेत ही आवक ३० ते ३५ हजार पेट्यांपर्यंत होणे अपेक्षित होते.
◼️ मात्र, सध्या ती आवक केवळ ७ ते ८ हजार पेटीवर आली आहे. मागणीदेखील वाढली आहे.
◼️ मात्र, मालच उपलब्ध नसल्याने अक्षय तृतीयेलाच हापुसवर परिणाम झाला आहे.
हवामानातील बदलांमुळे यंदा हापूस आंब्यांची आवक घटली आहे; त्यामुळे आंबा महाग झाला आहे. पूर्वी दरवर्षी ३०-३५ हजार पेट्यांची आवक व्हायची. यंदा केवळ ७ ते ८ हजार पेट्या आल्या आहेत. यामुळे अक्षय तृतीयेला बाजारात आंब्याचा तुटवडा आहे. पुढील आठवड्यात दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या ८०० ते १५०० रुपये डझनचा दर आहे. - युवराज काची, आंब्याचे व्यापारी
अधिक वाचा: पीकविमा योजनेतून पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई जाहीर; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
