आनंद इंगोले
वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. यावर्षीही कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. परंतु, अतिवृष्टीने तसेच किडीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात बरीच घट झाली. अशावेळी शासनाने सीसीआयमार्फत कापूस खरेदी करून हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली.
मात्र, सीसीआय खरेदीकरिता असलेल्या जाचक अटींमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाची आशा सोडून कमीभावात कापूस विकल्याचे वास्तव समोर आले आहे. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये तब्बल २ लाख २० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती.
यावर्षी कापसाचे उत्पन्न चांगले होईल, अतिवृष्टी आणि रोगाच्या प्रादुर्भावाने हताश केले. सर्वत्रच कापसाचे उत्पादन कमी असल्याचे चांगला भाव मिळेल असे वाटत होते, पण कवडीमोल भावात कापूस विकावा लागला. शासनाकडून सीसीआयमार्फत हमीभावात कापूस खरेदी करणे गरजेचे असताना सीसीआयची खरेदी म्हणजे 'रात्र थोडी सोंगे फार' अशी अवस्था होती.
कमीतकमी शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस द्यावा, असा डाव यांनी साधला आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे यशही आले. खासगी व्यापाऱ्यांनी तब्बल ७ लाख २८ हजार ६८५.८१ क्विंटल कापूस खरेदी केला तर सीसीआयने केवळ ३ लाख २७हजार ३१.४० क्विंटलच कापूस खरेदी केला आहे. या आकडेवारीवरून निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांनाच कमी दरामध्ये कापूस विकल्याचे दिसून येत आहे.
कापूस खरेदीची तालुकानिहाय आकडेवारी (क्विंटलमध्ये)
| तालुका | खासगी खरेदी | सीसीआय खरेदी | एकूण खरेदी |
| हिंगणघाट | २,७३,०१०.०० | ८३,६२२.०० | ३,५३,६३२.०० |
| वर्धा | ८६,२३७.२४ | ५५,६२९.८३ | १,४१,८६७.०० |
| आर्वी | १,१९,९६८.४५ | १४,२६२.१४ | १,३४,२३०.५९ |
| पुलगाव | ९६,९८९.२१ | ६७,१८५.३५ | १,६४,१७४.५६ |
| समुद्रपूर | ६३,४२९.९१ | ७३,१६४.९९ | १,३६,५९४.९० |
| सिंदी (रेल्वे) | ८८,३९०.०० | १९,३९४.०० | १,०७,७८७.०० |
| आष्टी | ६५८.०० | १३,७७३.०९ | १४,४३१.०९ |
कापूस विकणारे शेतकरी...
एकूण शेतकरी - ६९,०२५
सीसीआयला कापूस देणारे - १७,१०६
व्यापाऱ्याला कापूस देणारे - ५१,९१९
खरेदी केलेला कापूस
एकूण खरेदी - १०,५५,७१७.२१ क्विंटल
सीसीआयकडून खरेदी - ३,२७,०३१.४०
व्यापाऱ्यांकडून खरेदी - ७,२८,६८५.८१
व्यापाऱ्यांच्या गोदामात गेल्यावर वाढले भाव
वर्धा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कापूस विकून मोकळे झाले आहे. सध्या व्यापाऱ्यांच्या गोदामामध्ये कापूस साठवून आहे. अशातच आता कापसाच्या दरामध्ये चांगलीच दरवाढ झाली आहे. सध्या कापसाला ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या गोदामात कापूस गेल्यानंतर होणारी ही भाववाढ शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी असल्याची भावना कापूस उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.
