संदीप माने
खानापूर : खानापूर घाटमाथ्यावरील हिरवे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या द्राक्षाच्या निर्यातीचा हंगाम जोमात सुरू असून, युरोपीय राष्ट्रांमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्षास प्रति किलो १५० ते १६० रुपये दर मिळत आहे.
द्राक्ष पिकासाठी योग्य हवामान व कसदार जमीन असल्यामुळे घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांनी द्राक्षबागा कष्टाने फुलविल्या असून, या परिसरातील द्राक्षांना जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असते.
पळशी, हिवरे, करंजे, बेनापूर, बलवडी (खा.), सुलतानगादे, बानूरगड या परिसरात द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागांसाठी पळशीचे नाव जगभर प्रसिद्ध आहे.
गेल्या वर्षी या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बागांमध्ये अनेक दिवस पाणी साचून राहिले होते. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षकाड्या परिपक्व होण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती.
यामुळे परिसरातील अनेक द्राक्ष बागा वाया गेल्या. मात्र, ज्या द्राक्ष बागांना कमी अधिक प्रमाणात द्राक्ष घड आले होते, त्या शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चांगला निर्यातक्षम द्राक्ष माल तयार केला आहे.
द्राक्ष उत्पन्नात घट झाल्याने यावर्षी दरात चांगलीच वाढ झाली आहे. गेल्यावर्षी प्रति किलोस १०० ते १२० रुपये असणारा दर यावर्षी सुरुवातीलाच १५० ते १६० रुपये आहे.
द्राक्ष दरात वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा
◼️ खानापूर घाटमाथा परिसरात सध्या थंडी जाणवत आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढू लागताच द्राक्ष दरात अजून वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
◼️ युरोपीय राष्ट्रांच्या मध्ये मागणी वाढू लागल्याने व चांगल्या दरामुळे द्राक्ष उत्पन्नात घट होऊनही मोठ्या उत्पन्नाची आशा असल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण आहे.
अधिक वाचा: उन्हाळ्यात चटणी करताय? मग कोणत्या मिरचीला काय सुरु आहे दर? वाचा सविस्तर
