रत्नागिरी: उष्मा वाढताच आंबा तयार होऊ लागला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवक वाढली आहे.
गेल्या तीन दिवसात ४५ हजार आंबा पेट्या विक्रीला आल्या आहेत. मात्र, युद्धामुळे आखाती प्रदेशातील आंब्याची निर्यातच बंद असल्यामुळे परदेशी बाजारपेठ ठप्प आहे.
त्यामुळे आंबा खरेदीवर परिणाम झाल्याने दर गडगडले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत ४ हजार ते १० हजार रुपये पेटीला दर मिळत होता. मात्र, सध्या ३ हजार ते ५ हजार रुपये इतकाच दर मिळत आहे.
यावर्षी फुलोरा मोठ्या प्रमाणावर
◼️ फुलोरा मोठ्या प्रमाणावर पण तुलनेने नर मोहराचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे अपेक्षित फळधारणा झालीच नाही.
◼️ त्यातच दव मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे मोहर काळा पडला व गळून गेला.
◼️ अति थंडीमुळे फळगळही मोठ्या प्रमाणावर झाली.
◼️ त्यामुळे जेमतेम १० ते २० टक्केच आंबा वाचवण्यात बागायतदारांना यश आले.
◼️ यावर्षी ८० टक्के आंब्याचे नुकसान झाल्याचे कृषी विद्यापीठाने सांगितले आहे.
६० टक्के आंबा होतो निर्यात
◼️ नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या एकूण आंब्यापैकी ६० टक्के आंबा परदेशी निर्यात होतो.
◼️ उर्वरित २० टक्के आंबा मुंबईत तर अन्य २० टक्के आंबा इतर राज्यांत विक्रीसाठी पाठविण्यात येतो.
◼️ मात्र, निर्यातच बंद असल्यामुळे आंबा विक्री मुंबई व उपनगर तसेच अन्य राज्यांत करावी लागत आहे.
◼️ परदेशातील निर्यात ठप्प असल्यामुळे महागडा आंबा खरेदीसाठी स्थानिक बाजारात ग्राहक नसल्यामुळे दराअभावी बागायतदारांचे आर्थिक नुकसान होत आहे
कृषी विभाग, विद्यापीठाचा अहवाल
◼️ कृषी विभाग व कोकण कृषी विद्यापीठाकडून सर्वेक्षण करून आंबा पिकाच्या नुकसानाचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
◼️ त्यामुळे अति थंडीमुळे आंबा पिकाचे ८० टक्क्के नुकसान झाले असून, उर्वरित २० टक्केच आंबा पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.
खत व्यवस्थापनापासून खर्च
◼️ खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात पाठविण्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.
◼️ लाकडी खोका, गवत, मजुरी, वाहतूक, खते-कीटकनाशके मिळून पेटीला १,४०० ते १,५०० रुपये खर्च येतो.
◼️ त्यामुळे खर्चापेक्षा अधिक दर मिळणे अपेक्षित आहे.
◼️ तरच शेतकऱ्यांचा आंबा पीक उत्पादनासाठी केलेला खर्च निघू शकतो.
◼️ मात्र, निर्यात बंद असल्याने दर गडगडले आहेत.
नैसर्गिक संकटामुळे आंबा पीक धोक्यात असताना, युद्धाची झळ बसल्याने विक्री व्यवसायावरही संकट ओढावले आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या आंबा बागायतदारांना यावर्षीचे वर्ष आव्हानात्मक आहे. बाजारातील दर टिकले तर किमान केलेला खर्च निघू शकतो. त्यामुळे बागायतदारांना यावर्षी फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. - आनंद देसाई, उद्योजक
अधिक वाचा: जमिनीची तोंडी वाटणी व पोट हिश्याचे वाद आता मिटणार; सातबारा व नकाशावर होणार 'हे' बदल
