सय्यद लाल
उन्हाळ्याचा वाढू लागल्याने तडाखा रसवंतीसाठी उसाच्या मागणीत वाढ झाली आहे. याचा थेट फायदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असून, येथील ३१०२ वाणाचा ऊस गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कोलकातापर्यंत पोहोचला आहे. सध्या उसाला प्रतिक्विंटल ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये असा विक्रमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांनी यंदा चांगला पाऊस झाल्याने विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने बाजार सावंगी, येसगाव, ताजनापूर, शेलगाव यांसह अनेक गावांतील ऊसलागवडीला प्राधान्य दिले. या भागात सध्या उसाची उंची १० ते १२ फुटांपर्यंत पोहोचली असून, एकरी ६० ते ७० टनांपर्यंत भरघोस उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर राऊत यांनी सांगितले.
या भागातील ऊस गोड, चविष्ट आणि रस बराच वेळ काळा पडत नसल्याने रसवंती व्यावसायिकांची याला पहिली पसंती आहे. दररोज या भागातून किमान दीड ते दोन हजार टन ऊस परराज्यात ट्रकद्वारे पाठविला जात आहे. कमी श्रमात आणि कमी खर्चात हे पीक जास्त नफा मिळवून देत आहे. - के. एन. इंगळे, मंडल कृषी अधिकारी, बाजारसावंगी.
नगदी पिकाने दिला आर्थिक आधार
जानेवारी महिन्यात चार हजार रुपये असलेला भाव आता ५ हजार २०० रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी उत्पादन आणि वजन अधिक मिळत असल्याने अनेक शेतकरी एकाच लागवडीवर चार वर्षांपर्यंत पीक घेत आहेत. ऊस व्यापारी रऊफ पटेल यांच्या मते, परराज्यातील वाढत्या मागणीमुळे यंदाचा हंगाम ऊस उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने 'गोड' ठरत आहे.
