करमाळा: इराणयुद्धाचा भडका उडाल्याने केळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना तोड थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत.
करमाळा तालुक्यात १० हजार एकर क्षेत्रात तब्बल तोडणीलायक १५ हजार मे. टन केळीचे उभे पीक आहे. निर्यातदारांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये तब्बल एक हजार मे.टन केळी सध्या शिल्लक आहेत.
एकट्या करमाळा तालुक्यात निर्यातक्षम एक हजार मेट्रिक टन केळी निर्यातदारांकडे शिल्लक असून जोपर्यंत शांततेची परस्थिती निर्माण होत नाही. तोपर्यंत निर्यातदार व शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
माढा तालुक्यातील टेंभुर्णी व करमाळा तालुक्यातील कंदर येथील निर्यात केंद्राकडून पाठविलेली ३०० कंटेनर केळी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जेएनपीटी बंदरात युद्धामुळे अडकली आहेत.
इराण हा केळीचा सर्वांत मोठा आयातदार देश आहे. आठ ते दहा दिवसांत केळीची निर्यात सुरू झाली नाही तर केळी उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे.
रमजान महिन्यात मोठी मागणी
◼️ सध्या रमजानचा महिना सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील केळीला आखाती देशातून मोठी मागणी वाढली आहे.
◼️ आखाती देश गुणवत्तेच्या आधारे येथील केळी खरेदी करतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली गुणवत्ता टिकून ठेवली आहे.
◼️ गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील निर्यातदारांनी खरेदी केलेली केळी इतर देशांमध्ये पाठवण्यासाठी जेएनपीटी बंदरात पाठवली आहेत.
◼️ मात्र, अचानक भडकलेल्या युद्धामुळे हा माल पुढे जात नसून बंदरातच माल पडून आहे.
निर्यात दर २५ तर स्थानिक भाव १४ रुपये
◼️ आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी पुढील सूचना येईपर्यंत माल पाठवू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत
◼️असे असले तरी केळी वेळेत पोहोचली नाही, तर व्यापाऱ्यासोबत उत्पादकांनाही मोठा फटका बसणार आहे.
◼️ कारण निर्यातीच्या दरात व स्थानिक खरेदीच्या दरात मोठी तफावत आहे.
◼️ केळीच्या निर्यातीचा दर १८ ते २५ रुपये प्रति किलो तर स्थानिक बाजारातील दर १३ ते १४ रुपये प्रति किलो आहे.
निर्यातीची केळी समुद्रामार्गे रशिया व इराणला जाण्यासाठी ३० दिवस लागतात मात्र केळी फक्त ४० दिवस टिकतात व त्यानंतर पिकण्यास सुरुवात होते. हे युद्ध लवकर थांबले नाही तर व्यापारी उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. - किरण डोके, केळी निर्यातदार, कंदर (ता. करमाळा)
अधिक वाचा: ऊस काटा मारीवर अंकुश ठेवण्यासाठी अखेर शासनाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर
